Sand Mafia Attacks and Fires at Farmers Opposing Illegal Mining!

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू माफियांचा थरार! गोदावरी पात्रात बेकायदेशीर उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट गोळीबार

Sand Mafia Attacks and Fires at Farmers Opposing Illegal Mining!
छत्रपती संभाजीनगरमध्ये: अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू तस्करीचा एक अत्यंत भीषण आणि रक्तरंजित चेहरा समोर आला आहे.
गंगापूर तालुक्यातील बाभुळगावगंगा (बाभुळगाव) परिसरातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांवर वाळू तस्करांच्या टोळीने केवळ बेदम मारहाणच केली नाही, तर त्यांच्यावर थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे.
या जीवघेण्या हल्ल्यात शेतकरी बंधू अंधाराचा फायदा घेऊन पळाल्याने बालंबाल बचावले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकं काय घडलं?बाभुळगावगंगा येथील स्थानिक शेतकरी जालिंदर सोपान कुंजीर यांची गोदावरी नदीपात्राजवळ शेतजमीन आणि विहीर आहे.

शनिवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास कुंजीर हे आपल्या शेतातील विहिरीवर कृषी पंप (विद्युत मोटार) सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर आणि मशीनचा मोठा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी नदीपात्राच्या दिशेने जाऊन पाहिले असता, तेथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. शेतकऱ्यांनी या अवैध वाळू उपशाला विरोध करत आवाज दिला असता, तिथे उपस्थित असलेल्या वाळू माफियांनी त्यांना घेरले.
आरोपींनी कुंजीर यांना पकडून अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आणि लाकडी दांडके, काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर तस्करांनी या शेतकऱ्यांचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केला.

थेट गोळीबार आणि 'मोक्का'मधील आरोपीचा समावेश: शेतकरी कुंजीर बंधू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अंधाराचा फायदा घेऊन नदीपात्रातून गावाच्या दिशेने धावत सुटले. ते पळत असताना मागे असलेल्या वाळू तस्करांनी त्यांच्यावर पिस्तुलातून थेट गोळीबार (Shootout) केला. सुदैवाने अंधार असल्याने तस्करांचा नेम चुकला आणि गोळी बाजूने निघून गेल्याने शेतकरी बालंबाल बचावले.
या हल्ल्यादरम्यान तस्करांनी शेतकऱ्यांना "तुम्हाला नीलेश शेंडगेसारखे संपवून टाकू," अशी थेट जीवे मारण्याची धमकीही दिली. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्याचे नेतृत्व श्रीरामपूर नगरपालिकेचा एक अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे हा करत होता. दाभाडे हा 'मकोका' (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आणि एका हत्या प्रकरणात आधीच फरार असलेला कुप्रसिद्ध गुन्हेगार आहे.
फरार असूनही तो राजरोसपणे वाळू उपसा आणि गुन्हेगारी कृत्य करत असल्याने स्थानिक प्रशासनावर आणि पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ९ जणांवर गुन्हा दाखल:या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे याला पकडून चोप दिला, मात्र तो तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला.

याप्रकरणी पीडित शेतकरी जालिंदर कुंजीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वीरगाव (वैजापूर) पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे, उद्देश मंडलिक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी ढमके, राहुल चव्हाण, विजय हटांगळे, मंगेश साळवे, विजय पवार आणि राहुल थोरात अशा ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *