जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला..; अजितदादांबद्दल बोलताना फडणवीस भावूक

विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (सोमवार, 23 फेब्रुवारी 2026) सुरू झालं. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला. यावेळी अजितदादांचं काम, त्यांचा स्वभाव, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, वैयक्तिक पातळीवरील मैत्री या सर्व विषयांवर त्यांनी भाष्य केलं. या शोकप्रस्तावाच्या अखेरीस फडणवीसांनी कवी पी. सावळाराम यांच्या एका गीतेतील कडवं म्हणून दाखवलं. ‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला..’ या त्यातील ओळी त्यांनी अजितदादांसाठी समर्पित केल्या.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

“कोविडच्या संकटात दादा पूर्णपणे मैदानात होते. आपल्याला कल्पना आहे की त्या काळात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण खंबीरपणे राज्याचे अर्थमंत्री म्हणून आणि त्याहीपलीकडे ही आपली जबाबदारी आहे असं समजून संपूर्ण कोविड काळात सरकारची बाजू योग्य प्रकारे मांडणं, सरकारचे निर्णय योग्य होतील या दृष्टीने काम करणं.. या सगळ्या गोष्टी दादांनी केल्या आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन की महाराष्ट्राने एक नेता गमावला, एक प्रशासक गमावला. मी वैयक्तिक एक मित्र गमावला. आपण सगळ्यांनीच, ज्यांना आपण एक कुटुंब समजत होतो, अशी कुटुंबातील एक व्यक्ती आपण गमावली आहे. साखर कारखानदारीच्या क्षेत्रात, सहकारक्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आपण सर्वांनी बघितलं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आपण पाहिलं आहे. प्रत्येक गोष्टी अजितदादांचा ठसा पहायला मिळतो. अशा प्रकारे काम करणं हे राजकीय नेत्यांनी शिकण्यासारखं आहे,” अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

याविषयी ते पुढे म्हणाले, “आज दादा आपल्यात नाहीत. आता आपल्याजवळ त्यांच्या स्मृतीच राहणार आहेत. कवी पी. सावळाराम यांचं एक गीत आहे. त्यातलं एक कडवं हे केवळ अजित दादांसाठीच लिहिलं गेलं का, असं वाटावं असं आहे. ‘जनसेवेचं बांधून कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून, अर्पुन आपुले हृदसिंहासन, नित् भजतो मानवतेला, जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला.. असं हे कडवं आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो.”



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *