नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ

नाशिक: जिल्ह्याील सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर लुटारूंच्या एका टोळक्याने मोठी दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मलढोण आणि दुशिंगपूर शिवारात (चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान) गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी पूर्वनियोजित सापळा रचत धावत्या वाहनांचे टायर पंक्चर केले आणि वाहनचालकांना व प्रवाशांना बेदम मारहाण करत लाखो रुपयांचा ऐवज लूटून नेला. या गंभीर घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुटुंबाला केले लक्ष्य आणि लुटला १८ लाखांचा ऐवज
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, श्रीकांत मिश्रा (वय ३८) हे आपल्या कुटुंबीयांसह मारुती सुझुकी कारने (क्रमांक एमएच २० जीके ०२०२) मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या गाडीवर अचानक लोखंडी वस्तू आदळली आणि जोरदार आवाजात गाडीचे टायर फुटले. श्रीकांत मिश्रा यांनी अत्यंत प्रसंगावधान राखत आपल्या गाडीचा वेग नियंत्रित केला आणि महामार्गावर गाडी थांबवली. गाडी थांबताच आधीपासूनच दबा धरून बसलेल्या १० ते १२ दरोडेखोरांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीला घेराव घातला.

 

लुटारूंनी वाहनातील लहान मुलांना बाहेर खेचण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. या अचनाक झालेल्या हल्ल्याने आणि दरोडेखोरांच्या उग्र रूपामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी जीवाच्या बाजी लावून अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे आणि रोख ८४ हजार ५०० रुपये असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटारूंच्या स्वाधीन केला. दरोडेखोरांनी या दरम्यान प्रवाशांना मारहाणही केली.

इतर वाहनांनाही बनवले टार्गेट
याच टोळीने महामार्गावरील आणखी काही वाहनांना अशाच पद्धतीने लक्ष्य केल्याचे तपासात समोर आले आहे. एका हिंगोलीहून जाणाऱ्या वाहनावर दगडफेक करत लुटारूंनी असाच लुटीचा प्रयत्न केला. एका वाहनचालकाने आपली गाडी न थांबवता प्रसंगावधान राखून गाडीचा वेग वाढवल्याने तो थोडक्यात बचावला.

याशिवाय, मध्यरात्री १:४० वाजण्याच्या सुमारास मुंबईहून प्रवास करणाऱ्या नांदेडच्या एका व्यापाऱ्याच्या वाहनाचे टायरही धारदार वस्तू टाकून फोडण्यात आले. कार थांबताच काही दरोडेखोर चालकाला मारहाण करण्यासाठी धावले. मात्र, संकटाची जाणीव झाल्याने आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या व्यापाऱ्याने त्याच्याजवळील परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन राऊंड फायर केले. गोळीबाराचा तीव्र आवाज ऐकताच दरोडेखोरांनी घाबरून महामार्गावरून खाली उड्या मारल्या आणि अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला.

पोलिसांची तात्काळ धाव आणि तपास सुरू
या गंभीर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, 'डायल ११२' पथक, 'क्यूआरव्ही' आणि वावी पोलीस ठाण्यातील अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक आशीष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी होणाऱ्या अशा गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी गस्ती पथके अधिक तीव्र करण्याची मागणी संतप्त नागरिकांमधून केली जात आहे.

 



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *