पालघर: घरात साचलेलं पाणी काढताना भिंत कोसळली, ४७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत

पालघर: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध दुर्घटनांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

भिंत कोसळून महिलेचा मृत्यू:
पालघर नगरपरिषद हद्दीतील जुना पालघर परिसरात राबिया शब्बीर सय्यद (वय ४७) या आपल्या पतीसोबत राहतात. गुरुवारी मुसळधार पावसामुळे त्यांच्या घरात पाणी शिरले होते. हे पाणी बाहेर काढत असताना अचानक त्यांच्या घराची जुनी भिंत अंगावर कोसळली. या दुर्घटनेत राबिया गंभीर जखमी झाल्या. त्यांना त्वरित शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती शब्बीर सय्यद देखील या दुर्घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत.

 

तरुण नदीपात्रात बुडाला:
दुसरीकडे, मनोर-पालघर रस्त्यावरील सज्जन पाडा येथील चंदन वरठा (वय २८) हा तरुण बुधवारी रात्री सूर्या नदीपात्रात मासेमारीसाठी गेला असताना बुडाला. तसेच, डहाणू तालुक्यातील पेठ येथील विठ्ठल केदार (वय ५५) हे देखील मासेमारीसाठी गेलेले अद्याप परतले नसून, त्यांचा शोध सुरू आहे.

नुकसानीची व्याप्ती:
जिल्ह्यात सध्या रेड अलर्ट असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पालघर तालुक्यातील धुकटण गावातही घराची भिंत कोसळल्याने नुकसान झाले असून, स्थानिकांनी पीडित कुटुंबाला तातडीने मदत केली आहे. याशिवाय, सूर्या प्रकल्पाच्या कालव्याचे काँक्रीटीकरण वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *