Ajit Pawar : अजितदादांची बॉडी प्रमाणापेक्षा अधिक… रोहित पवार यांचा दिल्लीत खळबळजनक दावा काय?

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी रोहित पवार यांनी एक सादरीकरण करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी त्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी आज दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेऊनही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांची बॉडी ही प्रमाणापेक्षा अधिक फुगली होती, हा प्रकार अबनॉर्मल आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांशी बोललो. दादांची बॉडी स्वेल (फुगली) होती. आगीत भाजून मृत्यूमुखी पडल्यावर बॉडी स्वेल होते का? असं आम्ही डॉक्टरांना विचारलं होतं. त्यावर डॉक्टर हो म्हणाले. पण दादांची बॉडी अॅबनॉर्मली अधिक स्वेल झाली होती, असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. रोहित पवार यांच्या या नव्या दाव्याने पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

सीबीआयही चौकशीत हवी

व्हिएसआरचा बिझनेस आजच्या आज बंद झाला पाहिजे. ती कंपनी मेंटेनन्स करत नाही, अशी मागणी करतानाच अजितदादांच्या अपघाताची चौकशी सीआयडी मार्फत करायला हरकत नाही. पण सीआयडीला काही मर्यादा आहेत. त्यामुळे या चौकशीत सीबीआयसारखी केंद्रीय यंत्रणा हवी. सोबतच कॅनेडीयन, यूके, यूएस किंवा फ्रान्स इथल्या कंपन्यांपैकी दोन कंपन्याही चौकशीत असल्या पाहिजे. विदेशातील कंपनी चौकशीत आल्यास अधिक चांगली चौकशी होईल. सीबीआय, सीआयडी, डीजीसीए यांच्यासोबत परदेशातील दोन कंपन्या कंपल्सरी चौकशीसाठी हव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

म्हणून आमचा खटाटोप

या सर्वांची एक टीम बनवा. अजितदादांच्या पक्षाचे नेते, कुटुंबातील लोक यांची एक टीम तयार करून ही चौकशी झाली पाहिजे. आमच्यासारख्यांनाही त्यात घेतलं पाहिजे. अजितदादा परत येणार नाही, पण आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे. आमच्या मनात जे प्रश्न आहेत, ते घेऊन आम्ही आयुष्य जगू शकणार नाही, असं सांगतानाच भविष्यात कुणाच्याही बाबत असे अपघात होऊ नये याची खबरदारी म्हणून आणि अजितदादांच्या अपघातातील सत्य बाहेर येण्यासाठीच आमचा हा खटाटोप असल्याचं त्यांनी सांगितलं.

सिंग पोहोचलेला, चौकशी महिन्याभरात व्हावी

कंपनीचा मालक विजय सिंग हा पोहोचलेला व्यक्ती आहे. तो कागदपत्रात छेडछाड करू शकतो. पुरावे नष्ट करू शकतो. चौकशीत हस्तक्षेप करू शकतो. यापूर्वीही त्याने प्रकरणं दाबली आहेत. त्यामुळेच परदेशी कंपन्यांना घेऊन एका महिन्यात या अपघाताच्या चौकशीचा रिझल्ट आला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

[embedded content]



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *