Risod News : तीन वर्षांपासून रस्त्याचे भिजत घोंगडे; चिखलमय रस्त्यात फसले खताचे ट्रॅक्टर, शेतकरी हतबल


Washim : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील चिखली- पेडगाव या रस्त्याचे भिजत घोंगडे तीन वर्षानंतरही कायम आहे. साधारण ३०० मीटर रस्त्याचे काम रखडले असून, सततच्या पावसामुळे या रस्त्यावर सध्या चिखल झाल्याने वाहन फसत आहेत. दरम्यान शेतात खत घेऊन जाणारे ट्रॅक्टर फसले. हे फसलेले ट्रॅक्टर काढण्यासाठी अन्य तीन ट्रॅक्टर आणावे लागले. यानंतर मोठ्या कसरतीने ट्रॅक्टर काढण्यात आले.

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील चिखली- पेडगाव दरम्यान असलेल्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. सन २०२१- २२ या वर्षात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चिखली ते पेडगाव हा रस्ता मंजूर झाला. रस्त्याचे काम सुरू व्हावे; म्हणून रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी या रस्त्यासाठी जमिनी दिल्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रिसोड व वाशिम येथील यंत्रणेने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच या रस्ता कामाला सुरूवात झाली.

काहींच्या विरोधामुळे काम रखडले

परंतू, चिखली गावापासून जवळपास एक ते दीड किमी अंतरावर काही जणांनी रस्ता कामास विरोध केल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी ५० ते ६० शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता, रिसोड तहसिलदार, जिल्हाधिकारी आदींना वेळोवेळी निवेदन दिले. परंतू, अद्यापही रस्ता काम पूर्ण झाले नाही. याचा त्रास शिवारातील शेतकऱ्यांना होत आहे.

दरम्यान या चिखलमय रस्त्याने शेतकऱ्यांना मोठा समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात खताचे ट्रॅक्टर फसल्याचे आज समोर आले आहे. तर शेत रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाकडून शिबिरे घेतली जात आहेत. मात्र, चिखली येथील रस्ता अपूर्ण असल्याने व शेतकऱ्यांची समस्या कायम असल्याने महसूल विभागाची शिबिरे केवळ देखावा तर ठरत नाहीत ना? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *