पुणे : विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच; १८४ कोटींचा निधी मंजूर

पुणे : करोना काळात राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढून अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच दिले जाणार आहेत. त्यासाठी १८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यात २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी वर्गातील वातावरण उत्साही, आनंदी आणि क्रियाशील ठेवणारे असावे, वर्गात केवळ श्रवणावर भर न देता शैक्षणिक साहित्याद्वारे प्रत्यक्ष कृती आणि प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अभ्यासक्रमातील उद्दिष्टे साध्य करण्यात येतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ होत असल्याचे दिसून आले. मात्र गेल्या दोन वर्षांत करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बराच काळ बंद असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेपासून वंचित राहून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेशी एकरूप ठेवणे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे आवश्यक असल्याने अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करणे, अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट आणि दृढ होतील असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालकांनी एप्रिलमध्ये सादर केला होता.  त्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य संच उपलब्ध करून देण्यासाठी १८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

शैक्षणिक संचांसाठी अभ्यास गट स्थापन केला होता. पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, मराठी या विषयांचे, तर तिसरी आणि चौथीसाठी इंग्रजी, गणित, मराठी, परिसर अभ्यास या विषयांतील महत्त्वाच्या संकल्पनांचे स्वतंत्र संच तयार करण्यात आले. हे संच शिक्षकांना अध्यापन करताना आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करतानाही हे संच उपयुक्त होतील. पाठय़पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना हे संच दिले जातील. त्यामुळे सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता येईल.  



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *