माझ्यावर १००च्या वर केसेस; भोंग्यासाठी अजून केस अंगावर घेऊ; राज ठाकरे

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २ एप्रिलला गुढीपाडव्यानिमित्त पार पडलेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. भाजप कडून राज यांच्या भमिकेचे जोरदार समर्थन झाले. तर, महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवली.

या मेळाव्यानंतर, युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला भाजपची 'सी टीम' म्हणत चिमटा काढला होता. तर, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंची भूमिका बदलली असून त्यांची स्क्रिप्ट भाजपकडून आल्याची टीका केली होती. तसेच, राज्यातील धार्मिक सलोख्याचे वातावरण राज ठाकरे बिघडवत असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

या सर्व आरोपांना आणि टीकांना राज ठाकरेंनी आज ठाण्यात पार पडलेल्या 'उत्तर सभेत' जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या मागील भाषणांचे व्हिडीओ सभेसमोर पडद्यावर दाखवून राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भातील आपली भूमिका नवीन आणून आपण सातत्याने भोंग्याच्या विरुद्ध भूमिका घेत आलो आहोत, असे सांगण्याचा प्रयत्त्न केला.

याच उत्तर सभेत राज ठाकरेंनी यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत असलेल्या भूमिकेचे जोरदार समर्थन करून, मशिदीवरील भोंगे 3 मे पर्यंत काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, आज 12 तारीख आहे व सध्या रमजान सुरु आहे, त्यामुळे आम्ही समजू शकतो. मात्र, राज्य सरकारने राज्यातील सर्व मशिदींच्या मौलवींना बोलवून 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा त्यानंतर आमची जी काही भूमिका असेल ती आपल्याला पाहावी लागेल.

राज ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाच्या 8 जुलै 2005 चा निकालातील टिपण्णीचा दाखल देत म्हटले, इतरांना त्रास होईल अशी तुमची प्रार्थना करा असा कुठला ही समज धर्म सांगत नाही. इतर धर्मियांना त्रास होईल अश्या गोष्टीला परवानगी देता कामा नये. त्यामुळे 3 तारखेनंतर जर भोंगे उतरले नाहीत तर, हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार असा थेट इशाराच दिला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *