क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा

 


महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना लोकप्रियपणे ज्योतिबा फुले किंवा क्रांतिसूर्य म्हणून ओळखलं जातं, हे १९व्या शतकातील भारतातील एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि क्रांतिकारक होते. त्यांनी जातीव्यवस्था, स्त्री-शोषण, अंधश्रद्धा आणि सामाजिक असमानतेविरुद्ध सातत्याने लढा दिला. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कामामुळे भारतीय समाजात शिक्षण आणि समतेची नवी दिशा निर्माण झाली. ज्योतिबा फुले हे केवळ शाळा काढणारे नव्हते, तर त्यांनी समाजाच्या मुळाशी असलेल्या अन्यायाला आव्हान दिले आणि शोषित वर्गाला स्वाभिमान आणि शिक्षणाची शक्ती दिली.
ज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात एका साध्या माळी कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंदराव फुले भाजी आणि फुले विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. आई चिमणाबाई लहानपणीच वारल्या. लहानपणी ज्योतिबांना शाळेत जाण्याची संधी मिळाली, पण जातीभेदामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. नंतर स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तिथे त्यांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, अमेरिकन स्वातंत्र्यलढ्याची आणि थॉमस पेन यांच्या स्वातंत्र्याच्या विचारांची ओळख झाली. या विचारांनी त्यांच्या मनात सामाजिक न्यायाची बीजं रोवली गेली. १८४८ मध्ये एका ब्राह्मण मित्राच्या लग्न समारंभात जातीभेदामुळे त्यांना अपमानित व्हावे लागले. त्याच क्षणी ज्योतिबांनी मनात ठरवले की आता जातीव्यवस्था आणि स्त्रियांवर होणारा अन्याय यांच्याविरुद्ध आयुष्यभर लढाई करायची.
ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्वात मोठी क्रांती केली ती स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीला फक्त सहा मुली शाळेत आल्या होत्या. सावित्रीबाई फुले यांना ज्योतिबांनी घरी स्वतः शिकवून शिक्षिका बनवले. पुढच्या काही वर्षांत त्यांनी तीन-चार मुलींच्या शाळा सुरू केल्या. अस्पृश्य मुलांसाठीही शाळा काढली. कामगारांसाठी रात्रीचे वर्ग घेतले आणि विधवांसाठी आश्रमही उभारला. त्या काळात स्त्रियांना शाळेत पाठवणे हे मोठे पाप समजले जात होते. लोकांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना दगड मारले, घाण फेकली, धमक्या दिल्या. पण या जोडीने कधीही मागे हटले नाही. ब्रिटिश सरकारच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनने १८५२ मध्ये त्यांच्या कामाचं कौतुक करून सन्मानित केले. ज्योतिबा म्हणत की, “मातृशिक्षणामुळे मुलांच्या प्रगतीत खूप मोठी सुधारणा होते.” त्यांनी स्त्रीशिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख साधन मानले.
१८७३ मध्ये ज्योतिबांनी आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलले. २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी सत्यशोधक समाजची स्थापना केली. या समाजाचा मुख्य उद्देश होता शूद्र, अतिशूद्र (दलित) आणि स्त्रियांना ब्राह्मणवादी वर्चस्वातून मुक्त करणे, त्यांना शिक्षण देणे आणि समाजात खरी समता प्रस्थापित करणे. सत्यशोधक समाजात सर्व जाती-धर्मातील लोकांना सदस्यत्व दिले गेले. ब्राह्मण पुजाऱ्यांशिवाय लग्न करण्याची प्रथा सुरू केली. ज्योतिबांनी आपली स्वतःची विहीर सर्वांसाठी खुली केली आणि घरी सर्व जातींच्या लोकांना जेवायला बोलावले.ते अस्पृश्यता, बालविवाह, सतीप्रथा आणि विधवा-शोषण यांच्याविरुद्ध सतत लढत राहिले. त्यांच्या या कामामुळे शोषित वर्गाला स्वाभिमान मिळाला आणि समाजात नवीन जागृती निर्माण झाली.
ज्योतिबा फुले हे लेखनातही तितकेच ताकदवान होते. त्यांची पुस्तके समाजातील खोटेपणा आणि अन्याय उघड करणारी होती. ‘गुलामगिरी’ या पुस्तकात त्यांनी जातीव्यवस्थेला जोरदार टीका केली आणि अमेरिकेतील गुलाम मुक्ती लढ्याला ते समर्पित केले. ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकात शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणावर सडकून टीका केली आणि शेतकऱ्यांना जमीन सुधारणा व स्वावलंबनाची गरज सांगितली. ‘त्रुतीया रत्न’ हे नाटक आणि ‘ब्राह्मणांचे कसब’ हे लेखन यातून ते समाजातील ब्राह्मणवादी वर्चस्व आणि खोट्या रूढींना आव्हान देतात. त्यांच्या लेखनातून शिक्षण, समता आणि न्याय यांचा संदेश स्पष्टपणे येतो.
१८८८ मध्ये विठ्ठलराव वंदेकर यांनी ज्योतिबांना ‘महात्मा’ ही प्रतिष्ठित पदवी दिली. दुर्दैवाने २८ नोव्हेंबर १८९० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी स्ट्रोकमुळे त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्योतिबांच्या विचारांनी खूप प्रेरणा मिळाली. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अनेक शाळा, सामाजिक संस्था आणि चळवळी त्यांच्या नावाने चालतात. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे काढली आणि अनेक ठिकाणी पुतळे उभारले आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले यांचा सर्वात मोठा योगदान म्हणजे त्यांनी समाजाला ‘शिक्षण हे स्वातंत्र्याचं हत्यार आहे’ हा संदेश दिला. त्यांनी केवळ शाळा काढल्या नाहीत तर शोषित आणि दुर्लक्षित वर्गाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दिली. स्त्रीशिक्षण, दलित-शूद्रांच्या हक्क, शेतकऱ्यांच्या समस्या आणि सामाजिक समता यासाठी त्यांनी जे काम केले ते आजही भारतीय समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त (११ एप्रिल) त्यांना श्रद्धांजली वाहताना आपणही त्यांच्या विचारांचे पालन करून समतेच्या दिशेने पाऊल टाकूया.

-विश्वजीत माने 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *