Pune : १८ महिन्यांचं आश्वासन ठरलं फोल; पुण्यातील वासवानी पुलाचं अजूनही ५०% काम प्रलंबित, कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी

Pune : साधू वासवानी पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामातील सततचा विलंब पाहता कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महापालिकेला पत्र पाठवून, कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.

कोरेगाव पार्क–बंडगार्डन परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या पुलाचे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप ५० टक्के कामही पूर्ण झालेले नाही. दीड वर्ष उलटल्यानंतरही तीन खांबांचे काम प्रलंबित असल्याने पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने विलंबामागे तांत्रिक अडचणींचा दाखला देत बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. लष्कर भागाला पाणीपुरवठा करणारी १००० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी आणि त्या ठिकाणी असलेली रेल्वे लाईन ही प्रमुख अडचण ठरत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कामादरम्यान रेल्वे ट्रॅकला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पर्यायी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांत पूल पूर्ण करू, असा दावा त्यांनी केला आहे.

वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
पुलाच्या कामामुळे कोरेगाव पार्क, नॉर्थ मेन रोड, बंडगार्डन आणि साधू वासवानी चौक परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. साउथ मेन रोडकडील अंडरपास बंद असल्याने सर्व वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे, परिणामी प्रवासाचा वेळ तिपटीने वाढला आहे. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आवश्यक समन्वय न साधल्यानेच हे प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे.

पोलिस आयुक्तांचे आक्षेप
पोलिस आयुक्तांनी पत्रात काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत:

  • सुरुवातीला नेमलेले वाहतूक वॉर्डन काढून घेतल्याने पोलिसांवर ताण वाढला
  • सहा मीटर रुंदीचा पर्यायी मार्ग देण्याचे आश्वासन पाळले गेले नाही
  • कामाचा वेग अत्यंत संथ असून पुढील वर्षभरातही पूर्णत्वाची शक्यता कमी
  • विलंबासाठी जबाबदार कंत्राटदारावर तातडीने कारवाई करावी

महापालिकेची भूमिका
महापालिकेनुसार, रेल्वे हद्दीत येणाऱ्या भागासाठी ‘ओपन वेब गर्डर’च्या डिझाइनमध्ये बदल सुचवण्यात आले होते, ज्यास मंजुरी मिळण्यासाठी सुमारे नऊ महिने लागले. तसेच, मुख्य जलवाहिनी स्थलांतरित होईपर्यंत पुढील काम करणे शक्य नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाची अधिकृत मुदत २४ महिने (पावसाळा वगळून) असून मे २०२६पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *