प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी : सत्याच्या अनेक बाजू समजून घ्या- बलराज संघई

अनादिकाला पासून मनुष्याची ही जिज्ञासा आहे की सत्य काय आहे? ज्यावेळेस पासून माणसाने विचार करणे आरंभ केले त्यावेळेस पासून त्याच्या मनात हाच एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की सत्य काय आहे? वास्तविकता काय आहे? तत्व काय आहे? सर्वसाधारणपणे सत्य म्हणजे खरे इतकेच आपण जाणतो. परंतु मात्र कथन अभिव्यक्ती तेवढेच सत्य नसून संपूर्ण सत्य स्वरूप व्यापक आणि विराट असते. कोणत्याही व्यक्तीची समज, ज्ञान आणि अभिव्यक्ती क्षमता परिपूर्ण नसते. वास्तविकत: आपली इंद्रिय क्षमता, ग्रहण शक्ती, तर्कबुद्धी, विचारक्षमता, वाणी, भाषा ही अपूर्ण असते म्हणून ती संपूर्ण सत्याच्या व्यक्ततेमध्ये एका वेळी सक्षम नसते. म्हणूनच आपले जाणण्याचे साधनं अपूर्ण असतील तर समजण्याची क्रिया ही मात्र आमची आंशिक सत्य असते आणि त्यापुढे आपण जाऊ शकत नाही. महत्त्वाचे सूत्र आहे : सहप्रतीपक्ष पदार्थ हा एकत्व नसतो. तो अनेक प्रकारे व्यक्त केला जाऊ शकतो. प्रत्येक पदार्थांमध्ये परस्पर विरोधी तत्वही विद्यमान असतात. उदाहरणार्थ उजेड आहे तर अंधकारही असतो. अंधकार नष्ट होऊन उजेड त्याच ठिकाणाहून येतो. सुख आणि दुःख आहे. आपण दुःखाचा अनुभव करतो परंतु तेच दुःख जाऊन त्याच ठिकाणी परत सुखाचा अनुभव होतो. ऊन सावली आहे. ऊन जाते आणि त्याच ठिकाणी सावली येते. विचार-अविचार ही असतो. एक विचार जातो त्याच ठिकाणी दुसरा विचार येतो. या सर्व विद्यमानता एकाच जागी असतात. म्हणून एकाचे अस्तित्व जाऊन दुसरा प्रगट होतो. तो इतर दुरून कुठूनही येत नाही तो त्याच ठिकाणी असतो. मात्र हे जाणण्याच्या बुद्धीचा अविष्कार व्हायला हवा. विरोधी तत्वांचे सह-अस्तित्व असते हे जाणल्यानंतर कसल्याही प्रकारचा अन्यत्वभाव उरत नाही. जसे आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार आपले एक मत बनलेले असते. त्याचप्रमाणे अन्य व्यक्तीचेही स्वतःचे मत असते. वस्तूच्या विराट स्वरूपाची जाणीव होऊन अन्य मताचा आदर केला तर परस्पर विरोधी भाव नष्ट होतात. हत्ती आणि अंध व्यक्ती खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावाच्या बाहेर एक हत्ती आला. गावातील फारशा लोकांनी हत्ती पाहिलेला नव्हता. हत्ती पाहायला जाण्यासाठी गावाच्या बाहेर गर्दी होऊ लागली. आपणही हत्ती पाहून यावे असे प्रत्येकाला वाटू लागले. हत्ती पाहून आलेले लोक गावात येऊन परस्पर चर्चा करू लागले. याच गावामध्ये काही अंध व्यक्ती होते. हत्ती कसा असतो आहे हे जाणून घ्यावे असे त्यांनाही वाटू लागले. आपसात योजना आखून गावातील अंध व्यक्ती हत्ती जाणून घेण्यासाठी गेले. सर्व अंध व्यक्ती हत्तीला स्पर्श करून तो कसा आहे याचा अंदाज मनामध्ये बांधत होते. आणि आता ते आपसात बोलू लागले. त्यापैकी ज्याने हत्तीच्या सोंडेला स्पर्श करून पाहिला तो म्हणे हत्ती मुसळासारखा आहे. ज्याने हत्तीच्या पायाला स्पर्श करून जाणवला तो अंध व्यक्ती हत्ती खांबासारखा आहे असे म्हणू लागला. ज्याने हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला तो व्यक्ती हत्ती झाडू सारखा आहे असे आग्रहाने सांगू लागला. एका अंध व्यक्तीने हत्तीच्या कानाला स्पर्श केला आणि तो आपले मत ठामपणे मांडू लागला की हत्ती सुपा सारखा आहे. हत्ती विषयी हत्ती कसा आहे हे स्पष्ट करण्यासाठी सर्व अंध व्यक्ती एकमेकांशी आता जोरजोरात बोलू लागले. प्रत्येक जण म्हणत होता की माझेच म्हणणे बरोबर आहे, मी म्हणतो तसाच हत्ती आहे. काही वेळाने त्यांच्या विवादाचे रूपांतर परस्पर भांडणांमध्ये झाले. प्रत्येक अंध व्यक्ती आपल्या मताचा दुराग्रह करू लागला. याचवेळी त्यांच्या बाजूने एक सुशिक्षित समजदार व्यक्ती जात होता. त्याने पाहिले की काही अंध व्यक्ती हत्तीच्या स्वरूपाविषयी आपसात भांडत आहेत, तो जवळ आला त्यांनी त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. आणि त्यांना एका बाजूला घेऊन गेला. विवाद करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी स्पष्टीकरण दिले की तुमचे सर्वांचे म्हणणे बरोबर आहे. कोणीही चुकीचा नाही. परंतु तुम्ही हत्तीच्या एका अवयवाला स्पर्श केलेला आहे, आणि हत्ती केवळ त्याच स्वरूपाचा आहे असा आग्रह करत आहात. तुम्ही सर्वजण जे म्हणत आहात ते सर्व मिळून हत्तीचे पूर्ण अवयव होतात. आणि त्या सर्वांचा मिळून एक हत्ती होतो. त्या व्यक्तीच्या संबोधनानंतर सर्व अंध व्यक्तींच्या लक्षात आले की आपल्या सर्वांचं म्हणणं बरोबर आहे परंतु आपला समन्वय नसल्यामुळे वाद विवाद होत आहेत. आपण समजदारीची भूमिका घेतली आणि दुसऱ्याच्या मताचा आदर केला तर आपले आपसात वाद होणार नाहीत असा बोध घेऊन सर्वजण शांततेने गावात परतले. इतरांच्या मताचा आदर या गोष्टीवरून आपल्याला एवढाच बोध घ्यायचा आहे की आपले मत मांडत असताना दुसऱ्याच्या मताचा आदर केला पाहिजे. आणि केवळ आपलेच मत ग्राह्य असावे असा दूराग्रह नसावा. कारण सत्य एकांगी नसते, ते अनेक अंगी असते. त्यापैकी सर्व अंग खरे असतात. कोणते एकच अंग खरे आहे आणि दुसरी बाजू खरी नाही हा दुराग्रह कामाचा नसतो. सत्य असीम आहे , भाषेला सीमा आहे, अभिव्यक्ती त्याहून कमकुवत असते. प्रत्येक जण आपल्या बुद्धीप्रमाणे आणि प्राप्य शक्तीने व्यक्त होत असतो. पाण्याने अर्धवट भरलेला ग्लास : एखादा ग्लास अर्धा भरलेला आहे हे खरे, तसेच तो अर्धा रिकामा आहे हेही खरेच. ग्लास काचेचा आहे किंवा स्टीलचा आहे हेही चुकीचे नाही. ग्लास टेबलावर आहे किंवा जमिनीवर आहे हेही सत्यच. ग्लासमध्ये अर्धे पाणी आणि अर्धी हवा आहे हे सत्यही नाकारता येणार नाही. म्हणून सत्य अनेकांगी आहे, एकांगी नाही. हेच खरे. असाच अर्थबोध आपणास घ्यावयाचा आहे. दुराग्रह नको आपण ज्यावेळी केवळ आपल्याच विचारांचा आग्रह करतो त्यावेळी तो दुराग्रह बनत असतो. केवळ आपल्याच दृष्टिकोनाचा आग्रह न बाळगता दुसऱ्याने व्यक्त केलेल्या विचारातही काही तथ्य असेल असे मत असावे. याचाच अर्थ इतरांच्या विचाराबद्दल सहिष्णू बनणे. परस्पर वाद विवाद न होऊ देण्यासाठी वैचारिक सहिष्णुता खूप महत्त्वाची असते. आपल्या स्वतःच्या भावनांवरती आपले नियंत्रण असावे. इतरांच्या विचारांना समजण्याचा प्रयत्न असावा. प्रत्येकाने स्वतःच्या गर्व आणि अहंकाराला महत्त्व दिले तर कुटुंबात, समाजात आणि जगामध्ये शांतीपूर्ण सह-अस्तित्व आणि स्थिरता नांदू शकत नाही. (बलराज संघई, 9420015108 | वाळूज औद्योगिक परिसर, छत्रपती संभाजीनगर)


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *