Mumbai : एशियाटिकची निवडणूक स्थगित; पात्र उमेदवारांची यादी तयार करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

Mumbai : आज, शनिवारी होणारी द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. निवडणूक अवघ्या १६ तासांवर असताना धर्मादाय आयुक्तांकडून निवडणूक स्थगित करण्याबाबत निर्णय आल्याचे एशियाटिकच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

धर्मादाय आयुक्तांनी गुरुवारी निवडणूक अधिकारी प्रसाद अकोलकर यांना प्रत्यक्ष किंवा वकिलाच्या माध्यमातून हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या सुनावणीनंतर संकेतस्थळावर याद्याही करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला होता. मात्र, दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धर्मादाय आयुक्तांकडून काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद अकोलकर यांनी दिली. या निवडणुकीसाठी के. डी. तळोकर यांची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तळोकर यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२७च्या कालावधीसाठी निवडले गेलेले द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या संस्थेचे पदाधिकारी मंदार भारदे, विवेक गणपुले, कुमार केतकर, सुरेंद्र कुलकर्णी आणि प्रा. सूरज पंडित दैनंदिन प्रशासकीय कारभार पाहतील. केतकर आणि गणपुले निवडणुकीला उभे असल्याने मतदारयाद्या तयार करण्याच्या कामात हे दोघेही सहभागी नसतील, असेही या निर्देशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तळोकर, भारदे, कुलकर्णी आणि प्रा. पंडित यांची उपसमिती २०२५च्या निवडणुकीसाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करतील, असेही सांगण्यात आले आहे.

धर्मादाय आयुक्तांनी या निर्देशांमध्ये काही मुद्दे नमूद केले आहेत. ६ ऑगस्ट २०२५ रोजी व्यवस्थापकीय समितीने दिलेला चेंज रिपोर्ट नाकारण्यात आला होता. अर्ज छाननी समितीची मुदत २७ सप्टेंबर २०२५ रोजी संपली होती. त्यामुळे या समितीने त्यानंतरचे अर्ज स्वीकारणे हे नियमांच्या विरोधात होते, असे सांगत या मुद्द्यांच्या आधारे या उपसमितीने मतदारयाद्या तयार कराव्यात, असे धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशात म्हटले आहे. यापूर्वीही नोव्हेंबरमध्ये धर्मादाय आयुक्तांनी याद्यांसंदर्भात निर्देश दिले होते.

'कायदेशीर मार्गाने जाणार'
'निवडणूक प्रक्रिया घोषित झाल्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायद्यातील कलम ४१ अन्वये धर्मादाय आयुक्तांना त्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारा आदेश देता येत नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी साहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा आदेश बेकायदा ठरवून रद्दबातल केला होता. आता पुन्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना आणि अक्षरशः आयुक्तांनी मतदानाचा दिवस (१४ मार्च) तोंडावर असताना १३ मार्च रोजी धर्मादाय आयुक्तांनी निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कायदेशीर तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याने याविषयी आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन पुढचा कायदेशीर मार्ग अवलंबणार आहोत', असे यापूर्वी निवडणूकप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका करणारे विश्वास उटगी यांनी सांगितले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *