Pune : येरवडा–कात्रज दुहेरी बोगद्याला वेग; 54 किमीचा उत्तर–दक्षिण कॉरिडॉर नेमका कुठे जोडला जाणार?

Pune : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘पाताळलोक’ तयार करण्याच्या केलेल्या घोषणेनुसार पहिल्या भूमिगत बोगद्याला गती देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) वेगाने हालचाली सुरू आहेत. येरवडा ते कात्रज या दुहेरी बोगद्याचा (ट्वीन टनेल) आराखडा अंतिम टप्प्यात असून, येत्या आठवडाभरात सविस्तर प्रकल्पास सुरुवात करण्यात होणार आहे. त्यामळे हा बोगदा खरेच होणार की नाही, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

उत्तर-दक्षिण जोडणारा मार्ग
शहरात पूर्व ते पश्चिम जोडणारे अनेक रस्ते आहेत. मात्र, उत्तर ते दक्षिण जोडणारे मार्ग कमी आहेत. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ने येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग करण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पाचे पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण समितीच्या (पुम्टा) बैठकीत सादरीकरण करण्यात आले होते. तेव्हा त्यामध्ये काही बदल सुचविण्यात आले होते. त्यानुसार नुकत्याच झालेल्या ‘पुम्टा’च्या बैठकीत पुन्हा नव्याने सादरीकरण करण्यात आले.

येरवडा आणि कात्रज या दरम्यानचे अंतर १४.५ किलोमीटर आहे. या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. या नियोजित प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. व्यवहार्यता अभ्यासामध्ये या प्रकल्पाचे तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन होईल. त्यानंतर प्रकल्पाचा तपशीलवार पूर्व व्यवहार्यता अहवाल (डीएफआर) तयार करण्यात आला आहे. हा अहवाल ‘पुम्टा’च्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजिक खासगी भागीदारीसह (पीपीपी) अन्य प्रारूप पर्यायांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामध्ये ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरण करा’ (बीओटी) आणि हायब्रिड ॲम्युनिटी मॉडेलसारख्या (एचएएम) पर्यायांचाही विचार करण्यात येण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकाच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. जमिनीची कमतरता असलेल्या ठिकाणी वाहतुकीसाठी भूमिगत रस्ते हा दीर्घकालीन उपाय ठरेल. येरवडा-कात्रज बोगदा हा पूर्व पुण्याला दक्षिण उपनगरांशी जोडणारा उत्तर-दक्षिण कॉरिडॉर म्हणून नियोजित आहे.

मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् कामाला वेग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ५४ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गांचा (बोगदे) ‘पाताळलोक लोक तयार करण्याची घोषणा केली होती. पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते हे पूर्व-पश्चिम आहेत. तर, उत्तर-दक्षिण पुणे हे कोंडीत अडकले आहे. दक्षिण पुण्यात जायचे असेल, तर रस्ते छोटे आहेत. रस्ते तयार करण्यासाठी जमीन नसल्याने आता वाहतूक नियमित करण्यासाठी ‘पाताळलोक’ तयार करण्यात येणार येत असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. पुण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पाताळात जाणार असून, ५४ किलोमीटरचे भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे.

पहिला मार्ग हा कात्रजपासून सुरू होणार आहे. येरवडा, खडीमशिन चौक, स्वारगेट, रेसकोर्स, जगताप डेअरी, नरवीर तानाजी मालूसरे रस्ता (सिंहगड रस्ता), पाषाण, कोथरूड, कात्रज, औंध, संगमवाडी, खडकी हे परिसर भुयारी मार्गांनी जोडण्यात येणार असून, त्याचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी ३२ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. त्याचाच एक भाग म्हणून येरवडा ते कात्रज या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *