Pune : वाढत्या थंडीचा फटका; शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा

Pune : शहरात काही दिवसांपासून थंडीचा कडाका जाणवत आहे. विशेषतः सकाळी किमान तापमानात लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येते. परिणामी लहान मुलांना थंडीचा कडाका सोसत शाळेत जावे लागते. म्हणून आता शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेत बदल केला आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी-अधिक किमान तापमानाची नोंद होत आहे. परिणामी सकाळी हूडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. सकाळच्या वेळेत जाणवणाऱ्या थंडीमुळे विद्यार्थी गारठून जात आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळेतील बदल केला आहे. मध्यवर्ती भागातील काही शाळांनी नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे आता शाळा नियोजित वेळेपासून २० ते ४० मिनिटे उशिराने भरत आहेत. तर, काही शाळा अद्यापही वेळापत्रकात आवश्यक तो बदल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

Pune Weather Update : पुणेकरांनो, थंडी होणार तीव्र! ‘या’ तारखेपासून पारा सुमारे १० °C पर्यंत घसरण्याची शक्यता

'अत्यंत थंडीत लहान मुलांना सकाळी उठवणे आणि शाळेत पाठवणे कठीण होत होते. शाळांनी वेळ बदलल्याने मोठा दिलासा मिळाला', अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य संरक्षणासाठी हे योग्य पाऊल असल्याचे सर्वसाधारण मत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. परिस्थिती आणखी बदलल्यास शाळांच्या वेळेत पुन्हा सुधारणा करण्याबाबत प्रशासन सज्ज असल्याचे शाळांकडून सांगण्यात आले.

थंडीमुळे लहान मुलांना सकाळी शाळेत येताना त्रास होऊ नये, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळेच्या वेळेत थोडासा बदल करण्याचे नियोजन केले आहे. त्याला पालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्वांच्या सहकार्याने हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.

- प्रीतम जोशी, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ

सध्या सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका वाढला असून, लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. याच काळात शाळेत स्नेहसंमेलन आणि विविध खेळांच्या स्पर्धा सुरू असल्याने विद्यार्थी कोणत्याही उपक्रमापासून वंचित राहू नयेत आणि त्यांची तब्येतही बिघडू नये, यासाठी शाळेच्या वेळेत किरकोळ बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

- प्रसाद लागू, मुख्याध्यापक, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *