Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! पुढील २४ तास पावसाचे, अतिमुसळधार पाऊस बरसणार, वाचा Weather Report

Mumbai : शनिवारी दिवसभर ते रविवार सकाळपर्यंत दमदार बरसलेल्या पावसाने रविवारी मात्र मुंबई शहर व उपनगरांत काहिशी विश्रांती घेतली. मुंबईतील दोन्ही हवामान केंद्रांवर तुरळक पर्जन्यमानाची नोंद झाली. तर ठाणे, पालघर आणि भिवंडीत पावसाचा जोर कायम असून, मुसळधार सरींमुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शहर व उपनगरांत शनिवारच्या तुलनेत रविवारी पाऊससरींचा जोर कमी होता. मात्र, आज सोमवार आणि मंगळवारी मध्यम ते मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत शनिवारी दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली होती. सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० या २४ तासांत सांताक्रुझ येथे १४२ व कुलाबा येथे ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र त्यानंतर रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान सांताक्रुझ येथे फक्त २ तर कुलाबा येथे ५.८ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. यादरम्यान रविवारी दिवसभर आकाशात ढग होते. तुरळक सरी अधून-मधून पडत होत्या. मात्र जोरदार पाऊस कुठेही पडला नाही. त्यामुळे सुट्टीचा रविवार नागरिकांनी पाणी साचून होणाऱ्या त्रासाविना घालवला.

CM Shinde : "मराठा आणि ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका" सीएम शिंदेंचा आरोप

ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत


ठाणे, पालघर जिल्ह्यात शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. काळू, उल्हास नद्यांची पाणी पातळी वाढल्याने रुंडे पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून रायते पुलावरील वाहतूक रविवार सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. तसेच भिवंडीत कामवारी नदीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या परिसरातील वाहने पाण्याखाली गेली होती. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात काळू नदीची पातळी वाढल्याने रुंदे पूल पाण्याखाली गेल्याने रुंदा, उशीद, मढ, आरेले, भोंगाळपाडा, या गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांनी या पुलावरून ये-जा टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. तर उल्हास नदीची पाणीपातळी वाढत असल्याने रायता पुलावरील वाहतूक रोखण्यात आली होती. मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत केली. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर शुक्रवारपासून अनेक उत्साही तरुण, तरुणी सेल्फी घेण्यासाठी नदी परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून नदी परिसरात बॅरिकेड्स उभारून नागरिकांना तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली.

पालघरमध्ये वसई, वाडा, डहाणू, विक्रमगड तालुक्यांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे.

वाड्यात वाहनांचा खोळंबा


मनोर-वाडा महामार्गावर वरले गावाजवळ दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहनांना धक्का देऊन पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ आली. याच महामार्गावर पुढे गांधरे, नेहरोळी, लखमापूरफाटा, कुडूस अशा ठिकाणी रस्त्यावर नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली.

नद्या दुथडी भरल्या


पिंजाळ, वैतरणा, तानसा या नद्या रात्रभर कोसळणाऱ्या पाण्यामुळे दुथडी भरून वाहू लागल्या असून, नदीकिनारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाडा तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply