Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

Maharashtra News : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने दिवाळीसाठी यंदा राज्यभरातून ९०२ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या नऊ महिन्यांत महामंडळाच्या ताफ्यात दोन हजार ४०० बसगाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांचा एसटी प्रवास आरामदायी होणार असून आवश्यकता भासल्यास आणखी फेऱ्या चालवण्यात येतील, असा विश्वास महामंडळाच्या वाहतुक विभागाने व्यक्त केला आहे.

एसटीचा दिवाळी हंगाम १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान आहे. ऑनलाइन आरक्षणासाठी विशेष फेऱ्या एसटीच्या अधिकृत वेबसाइटसह अधिकृत दलालांच्या माध्यमातून उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच, विशेष वाहतुकीतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष मार्ग तपासनीसांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे पत्र वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना पाठवले आहे.

प्रवासी गैरसोय टाळण्यासाठी तिकीट आवश्यकतेनुसार खिडकीची वेळ वाढवण्यात यावी. सर्वच आरक्षण केंद्रांवर चार आणि सात दिवसांचे प्रवासी पास उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान एसटीच्या ताफ्यात नव्या दोन हजार चारशे गाड्यांची भर पडली आहे.

यात वातानुकूलित आणि साध्या (लालपरी) अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे आवश्यकता भासल्यास आणखी विशेष फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे, असेही एसटी महामंडळाने सांगितले. एसटी महामंडळाच्या या नियोजनाने यंदाच्या दिवाळीत प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

'या' शहरात धावणार विशेष फेऱ्या

  • मुंबई - २४० विशेष फेऱ्या

  • पुणे - २९२ विशेष फेऱ्या

  • संभाजीनगर - ६२ विशेष फेऱ्या

  • नाशिक - १४२ विशेष फेऱ्या

  • अमरावती - ६२ विशेष फेऱ्या

  • नागपूर - ४ विशेष फेऱ्या



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *