‘वंदे मातरम्’ला जन गण मनसारखा समान दर्जा द्या, उच्च न्यायालयात जनहित याचिका

वंदे मातरम् या गीताला भारतीय राष्ट्रगीतासारखाच दर्जा देण्यात यावा या मागणीला घेऊन दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असून वकील आणि भाजपा नेते आहेत.

याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी वंदे मातरम् या गीताला जन गण मन या राष्ट्रगीतासारखाच दर्जा देण्यात यावा अशी जनहित याचिकेद्वारे मागणी केली आहे. “भारत देश एक संघराज्य आहे. देशात सर्वांचे राष्ट्रीयत्व एकच आहे. त्यामुळे वंदे मातरम् या गीताचा आदर करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे,” असे अश्विनी कुमार उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे.

तसेच, “देशाला एकसंध ठेवण्यासाठी जन गण मन आणि वंदे मातरम् या गीताचा प्रसार आणि प्रचार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. हे दोन्ही गीत संविधान निर्मात्यांनी ठरविलेले आहेत. त्यामुळे या गीतामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचे कारण नाही,” असेदेखील या याचिकेत म्हणण्यात आले आहे.

“जन गण मन या राष्ट्रगीतामध्ये देशाला समोर ठेवून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे वंदे मातरम् या गीतात राष्ट्राचे चारित्र्य आमि विशेषता याबद्दल सांगण्यात आले आहे. त्यामुळे वंदे मातरम् या गीतालादेखील समान सन्मान मिळायला हवा. काही वेळा अनुमती नसलेल्या परिस्थितीत वंदे मातरम् हे गीत गायले जाते. या गीताचा आदर राखने हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे,” असेदेखील या याचिकेत म्हणण्यात आले आहे.

या याचिकेवर सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. या याचिकेबाबत भूमिका मांडण्यासाठी सरकारला सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या याचिकेवर ९ नोव्हेंबर २०२२ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply