Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला

Gautam Adani Maha Vikas Aghadi Government : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाबरोबर हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं होतं. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राष्ट्रवादी आणि भाजपाच्या युतीसाठी मोठ्या उद्योगपतीच्या घरात ही चर्चा झाली होती, असंही अजित पवार म्हणाले होते. हा मोठा उद्योगपती कोण, याबाबत अजित पवारांनी नुकतीच अधिकृत माहिती दिली आहे. न्यूज लॉन्ड्री या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की त्या बैठकीला गौतम अदाणी उपस्थित होते. यावरून शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की “गौतम अदाणींनीच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, अशी कबुली अजित पवारांनी दिली आहेत”.

खासदार राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासंदर्भात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी जी बैठक झाली. त्या बैठकीला गौतम अदाणी हजर होते. गौतम अदाणी, अमित शाह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मविआ सरकार पाडण्याचा कट शिजला. तेव्हा कोणाच्या अंगात आलं होतं ते तपासलं पाहजे. आम्ही (मविआ) अडीच वर्षे खूप चांगल्या प्रकारे सत्ता राबवली. परंतु, गौतम अदाणींना ते सरकार नको होतं. ही मुंबई त्यांना महाराष्ट्रापासून वेगळी करून बळकवायची आहे. त्यांना मुंबई गिळून टाकायची आहे”.

Mumbai : पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली

“मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव”

संजय राऊत म्हणाले, “गौतम अदाणीला मुंबई विकत घ्यायची आहे, महाराष्ट्रापासून ओरबाडायची आहे. म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा वापर करून शिवसेना तोडली, सरकार पाडलं. ही गोष्ट मी सांगत नाहीये. ही गोष्ट त्यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत. शिवसेना तोडण्यामागे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याागे गौतम अदाणी होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यामागे गौतम अदाणी होते, हे अजित पवारांनी कबुल केलं आहे. यापेक्षा मोठा कोणता पुरावा असू शकतो का? नरेंद्र मोदी, अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांनी ही मुंबई, हा महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा, महाराष्ट्र तोडण्याचा डाव रचला होता. त्यात ते यशस्वी झाले. मुंबई, महाराष्ट्र वाचवण्यासाठी आमची लढाई चालू आहे”.

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, गौतम अदाणी व त्यांच्या व्यापारी वृत्तीविरोधात आम्ही लढत आहोत. मोदी व अदाणी हे एकच आहेत. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व गौतम अदाणी हे एकच आहेत. या लोकांना महाराष्ट्राची सुत्र गौतम अदाणीकडे सोपवायची आहेत. परंतु, शिवसेना तसं होऊ देणार नाही. शिवसेना त्यांच्या मार्गात अडथळा बनली होती. म्हणूनच अदाणी, शाह, मोदी व फडणवीसांनी राज्यातलं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचलं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *