6 महिने तुरुंगात काढल्यानंतर राजपाल यादवला 9 कोटी भरावे लागणार की नाही?

अभिनेता राजपाल यादवला तुरुंगवासाची शिक्षा झाल्याने चेक बाऊन्स प्रकरण चर्चेत आलं आहे. 9 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यामुळे राजपालला तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं आहे. पण जर एखादी व्यक्ती चेक बाऊन्सप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर आली तर त्या व्यक्तीला कर्जाच्या रकमेची परतफेड करावी लागत नाही का? चेक बाऊन्स प्रकरणात एखाद्याला किती वर्षांची किंवा महिन्यांची शिक्षा होऊ शकते? राजपालला तुरुंगवास भोगल्यानंतरही कर्जाची रक्कम भरावी लागेल का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांबद्दल आणि कायदेशीर गोष्टींचा विचार केला तर राजपालकडे आता कोणकोणते पर्याय शिल्लक आहेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

नेमकं प्रकरण काय?

2010 मध्ये राजपाल यादवने ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दिल्लीतील एका बिझनेसमनकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि त्यानंतर राजपालच्या डोक्यावर कर्जाचं मोठं डोंगर उभं राहिलं. कर्ज फेडण्यासाठी त्याने जे चेक्स दिले, ते बँकेत बाऊन्स झाले. अपेक्षित रक्कम बँक खात्यात नसल्यावर चेक बाऊन्स होतात. इथूनच कायदेशीर कारवाईची सुरुवात झाली. राजपालवर जे 5 कोटी रुपयांचं कर्ज होतं, ते आता व्याज आणि पेनल्टीमुळे 9 कोटी रुपये झालं आहे.

राजपाल यादवसोबत आता पुढे काय होणार?

राजपालला कनिष्ठ न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला कर्ज फेडण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली, परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. कायदेतज्ज्ञांच्या मते आता राजपालकडे कोणते पर्याय आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.. पूर्ण शिक्षा भोगणे: 9 कोटी रुपये भरले नाहीत तर न्यायालयाच्या आदेशानुसार राजपालला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल. तक्रारदाराकडून तोडगा: जर या कालावधीत त्याने तक्रारदाराला (मुरली प्रोजेक्ट्स) ठराविक रक्कम देऊन प्रकरण मिटवलं, तर ते त्याची शिक्षा कमी करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अपील करू शकतात. चांगला वर्तनाचा फायदा: तुरुंगातील वर्तन चांगलं असल्यास तुरुंग प्रशासन कैद्याच्या शिक्षेत 15 ते 20 दिवसांची सवलत देऊ शकते. परंतु हे सर्व तुरुंगाच्या नियमांवर अवलंबून असतं.

चेक बाऊन्स प्रकरणातील शिक्षा किती असते?

चेक बाऊन्स झाल्यानंतर पैसे देणाऱ्याला 30 दिवसांच्या आत कायदेशीर नोटीस पाठवावी लागते. सूचना मिळाल्यानंतर, पैसे भरण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. जर या 15 दिवसांत पैसे दिले नाही तर खटला होऊ शकतो. त्यात दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.

तुरुंगवासानंतर कर्ज माफ होतं का?

तुरुंगवासाची शिक्षा ही गुन्ह्यासाठी सुनावली जाते, कर्जासाठी नाही. संपूर्ण शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही कर्जदाराकडे त्याचे पैसे वसूल करण्याचा अधिकार राहतो. जर आरोप तुरुंगवास भोगूनही पैसे भरत नसेल, तर न्यायालय त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊ शकते.

राजपाल यादवला 9 कोटी रुपये द्यावे लागतील का?

दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की राजपाल यादवने त्याची जबाबदारी मान्य केली आहे. त्यामुळे जरी तो आता तुरुंगात शिक्षा भोगत असला तरी त्याला थकबाकीची संपूर्ण रक्कम परत करावी लागेल. तुरुंगवासाची शिक्षा ही केवळ न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन आणि चेक बाऊन्स करण्याच्या त्याच्या वारंवार गुन्ह्यांसाठी सुनावलेली शिक्षा आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्या मालमत्तेतून किंवा कमाईतून पैसे वसू केले जाऊ शकतात.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *