पुणे : खडकवासला धरणसाखळीत यंदा दोन टीएमसीने कमी पाणीसाठा; पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

पुणे : खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये आतापर्यंत ९.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा तब्बल दोन टीएमसीने कमी असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. जलसंपदा विभागाकडून पुण्याला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून एकूण ९.९१ टक्के म्हणजेच ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी ४ मेपर्यंत हा पाणीसाठा ४० टक्क्यांपेक्षा जास्त होता. ग्रामीण भागासाठी उन्हाळी हंगामासाठी ११ मार्चपासून सुरू करण्यात आलेले आवर्तन १० मेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या काळात सहा टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यानंतर १० जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू केले जाणार असून या कालावधीत तीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. सलग ९० दिवस उन्हाळय़ात पिकांसाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, यंदा कडक उन्हाळा असल्याने प्रकल्पांमधील पाण्याचे जास्त बाष्पीभवन होत असून पाण्याची मागणीदेखील वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून पाणीचोरीतही वाढ झाली आहे, असे निरीक्षण जलसंपदा विभागाकडून नोंदविण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातही सध्या २.९७ टीएमसी म्हणजेच केवळ ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या नऊ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सिंचन आवर्तनासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सोडण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. महापालिकेला प्रतिमहिना सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीगळती, पाणीचोरी आणि पाऊस लांबल्यास नियोजनानुसार काही पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. उपनगरांमध्ये नागरीकरणही मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे महापालिकेला त्यापेक्षा अधिक पाणी घ्यावे लागत आहे. उच्च न्यायालयाने समाविष्ट २३ उपनगरांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. शहरालगतच्या अन्य उपनगरांमध्येही खासगी टँकरने पाणी घेतले जात आहे. या बाबी लक्षात घेतल्या तर जलसंपदा विभागाला पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागणार आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply