नवी दिल्ली :  देशात कोरोनाची चौथी लाट?; मार्चनंतर आढळले सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर देशातील रुग्णसंख्येत घट झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू आहे. चिंताजनक बाब म्हणजे मार्च महिन्यानंतरची ही देशात झालेली सर्वाधिक रुग्णवाढ आहे. 

देशात 11 मार्च रोजी 3000 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गुरूवारी (2 जून) देशात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. विशेष बाब म्हणजे बुधवारी देखील देशात कोरोनाचे 3712 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हा आकडा चार हजारांवर पोहोचला आहे. दरम्यान देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 177 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची दर 0.05 टक्के आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे.

गुरुवारी दिवसभरात 2 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 लाख 25 हजाप 379 नमुने तपासण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे आतापर्यंत 5 लाख 24 हजार 651 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना आजारातून 4 कोटी 26 लाख 22 हजार 757 रुग्ण बरे झाले आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.

दरम्यान देशात आढळून येत असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1 हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली.

निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्ये 373, तामिळनाडू 145, तेलंगणात 67, गुजरातमध्ये 50 तर मध्य प्रदेशमध्ये 25 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *