मुंबई: नालासोपाऱ्यात पूर २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नागरिकांची धडपड ठरली निष्फळ

मुंबई: वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थितीची भीषणता अद्याप कायम आहे. नालासोपारा पूर्व परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. पूराच्या पाण्यात अडकलेल्या २२ वर्षीय कविता दुधनाथ जैस्वाल या तरुणीचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नालासोपारा पूर्वेतील बकरा कंपाऊंड, मनीचा पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कमरेएवढ्या पाण्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचू शकत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी चादरीचे तात्पुरते स्ट्रेचर तयार करून तरुणीला पाण्यातून मार्ग काढत रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. संकटाच्या काळात नागरिकांनी दाखवलेली माणुसकी कौतुकास्पद असली, तरी या घटनेचा शेवट अत्यंत दुःखद ठरला.

दरम्यान, वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात अजूनही अनेक भागांमध्ये कंबरभर पाणी साचले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सोसायट्या, रुग्णालये आणि रस्ते अद्याप पाण्याखाली आहेत. रुग्णालयांमध्येही पाणी शिरल्याने काही रुग्णांना अन्यत्र हलवावे लागले असून, रुग्णवाहिकांना पोहोचण्यात अडचणी येत आहेत. नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *