शरद पवार कधीच एनडीएमध्ये जाणार नाहीत; 'हा' भाजपचा डाव, संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सामील होणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलीनीकरण होणार, अशा चर्चांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ही केवळ भाजपची एक राजकीय रणनीती असून, अफवा पसरवणे हे भाजपचे कामच असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, शरद पवार यांच्या विचारसरणीला आपण ओळखतो आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये जाईल किंवा विलीन होईल, ही शक्यता अजिबात नाही. "हे पूर्णपणे अशक्य आहे," असे ठाम मत राऊत यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडीचे देशात भवितव्य उज्ज्वल असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याचवेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. "एकनाथ शिंदे हे स्वतःचा पक्ष भाजपपेक्षा मोठा करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आव्हान आहे. शिंदे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा इतकी वाढली आहे की, भविष्यात ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही आव्हान देतील," असा दावा राऊत यांनी केला. त्यांनी पुढे म्हटले की, हे राजकारण आता केवळ 'खोके' किंवा 'पेटी'पर्यंत मर्यादित राहिले नसून ते आता कंटेनर आणि गोडाऊनपर्यंत पोहोचले आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील घटनेचा उल्लेख करत राऊत यांनी गृहमंत्रालयावरही टीका केली. एका महिला डॉक्टर आणि नर्सला शिंदे गटाच्या नगरसेवकाने मारहाण केल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत, गृहमंत्री पदाची पूजा करण्यापेक्षा आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढण्याचे आव्हान त्यांनी सरकारला दिले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *