अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका! माहिती अधिकार नियमांतील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांचे पत्र

माहिती अधिकार (RTI) नियमांमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त बदलांवर अखेर महाराष्ट्र सरकारने स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पत्र पाठवत राज्य सरकारने सुधारित नियमांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

राज्य सरकारने जून २०२६ मध्ये माहिती अधिकार नियमांमध्ये काही बदल केले होते. या बदलांमुळे माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक कठीण होईल, पारदर्शकतेवर परिणाम होईल आणि नागरिकांच्या माहितीच्या अधिकारावर मर्यादा येतील,
असा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता. त्यांनी सरकारला नियम मागे घेण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना पत्र लिहून राज्य सरकारने सुधारित नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले. तसेच संबंधित नियमांचा फेरआढावा घेण्यासाठी आणि विविध स्तरांवर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अण्णा हजारे यांनी यापूर्वी माहिती अधिकार कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी मोठी आंदोलने केली होती. यावेळीही त्यांनी सुधारित नियमांमुळे माहिती अधिकार कायद्याची धार बोथट होईल, असा आरोप करत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. सरकारच्या निर्णयानंतर हा वाद तात्पुरता शांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, पुढील नियमावली तयार करताना नागरिक, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि तज्ज्ञांशी व्यापक चर्चा करावी, अशी मागणी केली आहे. आता सुधारित नियमांबाबत सरकार पुढे कोणती भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *