एन. रघुरामन यांचा कॉलम:महिन्यातून किमान एकदा आपल्या ‘कॅफे ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स’मध्ये जा

त्यांनी मला विचारले, ‘तू कॉफी घेणार की चहा?’ मी उत्तर दिले, ‘मला कॉफी जास्त आवडते.’ त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि चहा घेऊन आल्या. मी हसलो. काहीतरी गडबड झाली असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी चिंतेत विचारले, ‘चांगला झाला नाही का?’ मी खात्रीने सांगितले, ‘खूप छान आहे. मला चहा आवडतो, विशेषतः तुम्ही बनवलेला.’ हे ऐकून त्या सहज झाल्या आणि चहा प्यायला बसल्या. मी लहानपणापासून या मावशींना ओळखतो. त्या माझ्या आईच्या सर्वात जवळच्या मैत्रीण आणि वडिलांच्या सर्वात चांगल्या मित्राच्या पत्नी होत्या. नागपूरच्या संगम चाळीत आम्ही शेजारी होतो. आमच्या घरांआड एकच भिंत होती. ती कॉलनी आज अस्तित्वात नाही. मग त्यांनी विचारले, ‘तुझ्यासोबत घरी कोण राहतं?’ मला संपूर्ण कहाणी पुन्हा सांगावी लागली की, त्यांची लाडकी मैत्रीण, माझी आई खूप आधीच वारली. माझ्या मुलीचे लग्न झाले आणि आता घरात फक्त मी आणि माझी पत्नी राहतो. जर माझे उत्तर फक्त ‘मी आणि माझी पत्नी’ असे असते तर त्यांनी नक्कीच पुढचा प्रश्न विचारला असता की, ‘तुझ्या आई-वडिलांना काय झाले?’ मी जेव्हाही भोपाळला जातो तेव्हा कमला सुंदरेसन मावशींना नक्की भेटतो. या ऑक्टोबरमध्ये त्या 86 वर्षांच्या होतील. गेल्या 45 वर्षांपासून त्या भोपाळच्या 1100 क्वार्टर्स येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोरील गल्लीत राहतात. या भेटींचे आंबट-गोड सौंदर्य असे की, मी कोण आहे हे आता त्यांना आठवत नाही. तरीही मी त्यांना 66 वर्षांपासून ओळखतो. लहानपणी त्या मला भरवायच्या आणि आईसोबत माझी काळजी घ्यायच्या. असे असूनही त्यांना माझे नावदेखील आठवत नाही. गेल्या रविवारी मी दोन तास त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांनी एकदाही माझे नाव घेतले नाही. जेव्हा त्यांचा दत्तक मुलगा राहुलने मला ओळखण्यासाठी गमतीने त्यांना विचारले तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘यांना कोण ओळखत नाही?’ त्यांच्यासोबत घालवलेल्या वेळेमुळे मला जपानच्या ‘रेस्टॉरंट ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स’ची आठवण आली. हा एक अनोखा सोशल पॉप-अप आहे, ज्याच्या संपूर्ण वेट-स्टाफमध्ये स्मृतिभ्रंशासह जगणारे लोक आहेत. पॉप-अपचा अर्थ असा की, हे कायमस्वरूपी रेस्टॉरंट नसून टोकियो, क्योटो आणि शिझुओकासारख्या शहरांमध्ये काही काळासाठी सुरू केले जाते. ग्राहकांना माहीत असते की, तिथे जवळपास 40% ऑर्डर चुकीच्या येऊ शकतात. तरीही ते जातात. कारण तिथे आपलेपणा, स्वीकार्यता आणि हलक्या-फुलक्या मनोरंजनाचे वातावरण असते. 2017 मध्ये टीव्ही दिग्दर्शक शिरो ओगुनी यांनी याची स्थापना केली होती. स्मृतिभ्रशाबाबत पूर्वग्रह मोडून काढणे आणि या आजारासोबत जगणारे लोकही समाजाचे सक्रिय व सक्षम सदस्य आहेत, हे दाखवणे हा यामागचा उद्देश आहे. तिथे लोकांना यासाठी प्रोत्साहित केले जाते की, जर ऑर्डर चुकीची आली तर नाराज होण्याऐवजी जे टेबलवर आले आहे त्याचा आनंद घ्यावा. तिथली डायनिंग रूम सखोल मानवतेने भरलेली आहे. स्टाफसाठी हा संवाद मिसळण्याची संधी देतो, एकटेपणा कमी करतो आणि जीवनातील उद्देशाची जाणीव करून देतो. मावशी आता फक्त जुन्या साड्याच नेसतात. त्यांना विचारले की नवीन साड्यांचे काय करणार? तर त्या म्हणतात, ‘मला यात आराम मिळतो.’ त्या आपली प्लेट धुण्यासाठी बाथरूममध्ये जातात. कारण त्यांना कित्येक दशकांपूर्वी संगम चाळीच्या मागच्या अंगणात प्लेट धुणे आठवते. त्या प्रत्येक मोलकरणीवर आरोप करतात की, त्या उभ्या राहून वेळ वाया घालवत आहेत, काम करत नाहीत. दुसरीकडे, राहुलने त्या सर्वांना सूचना दिल्या आहेत की, मावशीवर लक्ष ठेवा आणि त्यांना सोबत द्या, जेणेकरून त्यांना एकटेपणा जाणवणार नाही. यामुळेच आपण स्मृतिभ्रंशाशी झुंजणाऱ्या आपल्या प्रियजनांच्या भेटीला ‘काय फायदा? ते आपल्याला ओळखतही नाहीत’ असे म्हणून टाळता कामा नये. आपण त्यांना भेटायला गेले पाहिजे. कारण ‘आपण त्यांना ओळखतो.’ फंडा असा की, आपल्या वैयक्तिक ‘कॅफे ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स’मध्ये (स्मृतिभ्रंशाने ग्रस्त कोणत्याही ओळखीच्या व्यक्तीकडे नक्की जा.) तिथे मिळणारी डिश, ड्रिंक आणि संवाद कदाचित तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसतील, पण तिथे गेल्याने तुमच्या मनाला नक्कीच समाधान मिळेल.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *