Unseasonal Rain : अवकाळीचा तडाखा! पाऊस अन् गारपिटीमुळे उभं पीक आडवं, बळीराज्याच्या डोळ्यात पाणी

Unseasonal Rain : राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढचे काही दिवस अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट होत आहे. यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात आला आहे. आपल्या डोळ्यादेखत उभं पिक आडवं झाल्याचे पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे.

अहिल्यानगर -

सोमवारी सायंकाळी अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे कोपरगाव, राहाता, राहुरी या तालुक्यांना चांगलाच तडाखा दिला. काही ठिकाणी गारांचा सडा पडल्याचे बघायला मिळाले. गारपिटीसह पावसाने झोडपल्याने फळ बागांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

परभणी -

परभणी शहरासह जिल्ह्यात सोमवारी सायंकाळच्या अचानक जोरदार वादळी वारे सुटले. हे वारे इतके जोरदार होते की या वाऱ्याने सगळीकडे दानादान उडवून दिली. वर्षभर जोमात आलेले पिके मात्र अर्ध्या तासाच्या वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झालं. शेतकऱ्यांना या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला दिसत आहे. मोठ्या केळीच्या बागा, आंब्याच्या बागांचे मोठं नुकसान झाले आहेत. तर या फळबागा अक्षरशा भुईसपाट झालेल्या दिसत आहेत. या पिकाची तात्काळ प्रशासनाने पाहणी करून पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे

HSC Exam Result : निकाल पाहताच विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल; बारावीत कमी गुण मिळाल्याने जळगाव जिल्ह्यात दोघांची आत्महत्या

नांदेड -

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. या वादळी वाऱ्यामुळे नांदेडच्या अर्धापूर मुदखेड या तालुक्यातील केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले. केळीच्या बागा अक्षरशः आडव्या झाल्या आहेत. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी काढणीला आली होती. परंतू सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेला मोठा फटका बसला. केळीसह आंबा आणि उन्हाळी पिकांचे देखील या वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे.

अमरावती -

अमरावतीत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परतवाडा, चिखलदरा भागात गारपीट झाली. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. पुढील ३ दिवस पश्चिम विदर्भात गारांच्या पावसाची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे भुईमूग, तीळ, कांदा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

बुलडाणा -

बुलडाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. लोणार तालुक्यातील बिबीसह परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्याने अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाले. या पावसामुळे शेतातील कांदा , ज्वारी, भाजीपाला, फळपीकसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मोठे आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील शेतकरी बाजीराव ताऊबा आंधळे यांच्या शेतात वीज पडून तीन जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये त्यांचे मोठं नुकसान झाले.

जळगाव -

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाने पिलखोड शिवाराला झोडपून काढले. अनेक भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. मान्सूनपूर्व पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मका, ज्वारी, बाजरी, तसेच शेतात काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

 

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *