Prataprao Jadhav : संजय गायकवाडांच्या आरोपाला मंत्री प्रतापराव जाधव यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आमचा उमेदवार…”

Prataprao Jadhav On Sanjay Gaikwad : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांवर बैठका सुरु आहेत. मात्र, अद्याप शिवसेना (शिंदे) आणि भाजपामध्ये काही मंत्रि‍पदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेने गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. मात्र, गृहखातं देण्यास भाजपाने विरोध केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी सुरु असतानाच दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रतापराव जाधव यांनी आपल्याला निवडणुकीत मदतन करता विरोधकांचं काम केलं असा आरोप केला. या आरोपामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं. यानंतर प्रतापराव जाधव यांनी संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. ‘आमचा उमेदवार एवढा सक्षम होता की त्यांना जिंकून येण्याचा आत्मविश्वास होता. त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही’, असं सूचक भाष्य प्रतापराव जाधव यांनी केलं. दरम्यान, एकाच पक्षातील आमदार आणि खासदारामध्ये अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप सुरु असल्यामुळे शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

प्रतापराव जाधव काय म्हणाले?

“आमचा उमेदवार एवढा सक्षम होता त्यांना मीच काय? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा देखील त्यांनी स्वत:हून रद्द केली. त्यांना (संजय गायकवाड यांना) मोठ्या मताधिक्यांनी जिंकून येण्याचा आत्मविश्वास होता. मात्र, त्यांना थोडं कमी मताधिक्य मिळाल्यामुळे कदाचित त्यांना तसं काही वाटत असेल. त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपांना मी उत्तर देणार नाही. पण बुलढाणा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. सुज्ञ जनता निश्चितच कोणी काय केलं? हे मी सांगावं असं काही नाही. लोक सर्व समजून आहेत. लोकांना सर्व समजतं”, असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Politics : 'ते' पुन्हा येणार! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? नवी तारीख आली समोर

गायकवाडांनी जाधव यांच्यावर काय आरोप केले?

संजय गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरील आरोपावर बोलताना म्हटलं होतं की, “आरोप नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे. बुलढाण्यात शिवसेनेकडून (ठाकरे) रविकांत तुपकर यांचा एबी फॉर्म तयार होता. मात्र, अचानक आमच्या खासदारांचा (प्रतापराव जाधव) मिलिंद नार्वेकरांना फोन गेला आणि मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो. त्यानंतर संजय कुटे हे अनिल परब यांना फोन करतात आणि हे दोघेही सांगतात की उमेदवार बदलून द्या. जयश्री शेळकेंना उमेदवारी दिली तर आम्ही मदत करू. त्यानंतर तो उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला गेला”, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला.

गायकवाड पुढे म्हणाले, “मला असं म्हणायचं आहे की आमच्या खासदारांनी आणि आमच्या संपर्क नेत्यांनी असं का वागावं? तसेच भाजपा महायुतीतील आमदारांनी असं का वागावं? संजय कुटेंच्या घरी जयश्री शेळके यांची बैठक झाली, माझ्याकडे सर्व रिपोर्ट आहेत. भाजपाचा एकही कार्यकर्ता आमच्या बरोबर फिरला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे लोक तर आमच्या विरोधात काम करत होते. त्यामुळे ही लढाई आम्हाला एकट्यालाच लढावी लागली आणि जिंकली देखील. तिकीटच बदललं त्यामुळे काम करण्याचा प्रश्नच कुठे येतो? त्यांना मी (प्रतापराव जाधवांना) नकोच होतो. त्यांनी एकाही व्यक्तीला सांगितलं नाही की मला मतदान करा”, असा आरोप संजय गायकवाड यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *