भगवान महावीर जयंती विशेष:संग्रहाच्या आसक्तीतूनच वाढते हिंसा, अहिंसेचा मार्गच खरा उपाय, वाचा बलराज संघई यांचा लेख

संग्रहात आसक्त असलेला मानवच हिंसा वाढवतो जैन धर्मामध्ये २४ तीर्थंकर परंपरा आहे. जैन धर्माचे संस्थापक प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव आदिनाथ हे आहेत. तर २४ वे अंतिम तीर्थंकर भगवान महावीर हे होते. तीर्थंकर म्हणजेच संपूर्ण ज्ञानाच्या ( केवलज्ञान, कैवल्य, सर्वज्ञता) प्राप्ती नंतर जे श्रावक-श्राविका ( गृहस्थ ) साधू-साध्वी या रूप चतुर्विध धर्म संघाची स्थापना ( तीर्थ स्थापना ) करतात व संपूर्ण जीव जातीच्या कल्याणासाठी धर्मोपदेश करतात. भगवान महावीरांचा जन्म ई.स. पूर्व ५९९, चैत्र शु. त्रयोदशी या दिवशी क्षत्रिय, इक्ष्वाकु वंशीय राजा सिद्धार्थ,राणी त्रिशला देवी यांच्या पोटी वैशाली गणतंत्र राज्यात क्षत्रिय कुंडलपुर ( वर्तमान नालंदा जिल्हा, आजची बिहारची राजधानी पटना पासून उत्तरेस ६० किमी,बिहार ) या ठिकाणी झाला. वर्धमान महावीर हे वयाच्या तीस वर्षापर्यंत राजमहालात राहिले. त्या नंतर संन्यास्त होऊन साडेबारा वर्ष आत्मसाधने मध्ये एकाग्र होऊन केवलज्ञान म्हणजेच सर्वज्ञतेची प्राप्ती केली. पुढे तीस वर्ष भगवंतांनी समस्त जीव जातीच्या कल्याणासाठी धर्मोपदेश केला. भगवान महावीरांना वैशाख शुक्ल दशमी या दिवशी चौथ्या प्रहरामध्ये विजयी मुहूर्तात जांभीय ग्राम या ठिकाणी रुजू बालिका नदीच्या उत्तरी तीरावर विहार करत असताना शाल व्रक्षाच्या सानिध्यात गोदोहीका आसनामध्ये तप आचरणात असताना ज्ञानमुद्रेत केवलज्ञान अर्थात सर्वज्ञतेची प्राप्ती झाली. याच ठिकाणी भगवंतांनी गृहस्थ महिला आणि साधू साध्वींच्या समुदायास दिव्यवाणीने प्रथम उपदेश दिला. तीर्थंकरांच्या दिव्यवाणीचे वैशिष्ट्य असे असते की भगवंताचे ओठ न हलता दिव्य ध्वनी सर्व दिशेमध्ये सर्व प्राण्यांना समजेल अशा भाषेमध्ये प्रसारित होते. चारीही दिशेने भगवंताच्या मुखकमलाचे दर्शन होत असते. प्रथम प्रवचनात महावीरांनी आत्मसाक्षात्काराच्या चतुरंग मार्गाचे प्रतिपादन केले. १. सम्यक दर्शन : सत्यावर श्रद्धा ठेवणे. खरे गुरु, धर्म व शास्त्रावर श्रद्धा ठेवणे. २. सम्यक ज्ञान : वस्तुमात्राचे खरे स्वरूप जाणणे. ३. सम्यक चारित्र्य : संयमासह अचरण करणे. तपो ज्वाला द्वारा आत्मशुद्धी करणे. या जगाचे मुख्य तत्व दोन आहेत. आत्मा (जीव) आणि अनात्मा (अजीव). जीव आणि आत्म्याची शरीर मुक्त अवस्था म्हणजेच परमात्मा. आत्म्यापासून परमात्मा होण्याचे अहिंसा,सत्य, संयम धर्माचा अवलंब करणे हेच साधन आहे. सुखात आनंदी व दुःखात दयनीय होऊ नका .स्तुतीने फुलून जाऊ नका, निंदेने सुकून जाऊ नका,सन्मान प्रसिद्धीने गर्व आणि अपमानाने तुच्छता वाटून घेऊ नका. कोणासही हीन दिन असे समजू नका.जीवनातील सर्व द्वंद्वात तटस्थ रहावे आणि समतापूर्वक जीवन हीच अहिंसा आहे असा उपदेश भगवंतांनी केला. भगवान महावीरांनी सत्य धर्मासाठी विशेष प्रवचन केले. ते म्हणाले सत्य ईश्वर आहे, तेच सर्व सृष्टीमध्ये सार तत्व आहे त्याचा शोध घ्या. जीवनातील कोणत्याच व्यवहारात असत्याचा प्रयोग करू नका. सत्य हेच शाश्वत आहे, त्याच्या पालनासाठी त्यांनी काही नियम सांगितले. १. मानसिक सत्य २. वाचिक सत्य : ३. कायिक सत्य : अस्तेय किंवा अचौर्य बाबत एका विशेष प्रवचनात भगवान म्हणाले, इच्छे वर संयम असू द्या. आपल्या इच्छावर संयम असणारा इतरांच्या वस्तू अधिकार याचे हरण करत नाही. असंयमाने राग द्वेष वाढतात,नंतर मोह वाढतो.ज्याचा मोह वाढतो त्याचे दुःख वाढते. जर दुःखापासून सुटका हवी असेल तर इच्छावर संयम असू द्या. इच्छा संयम हा शाश्वत धर्म आहे त्याच्या पालनासाठी १. वस्तूंचा अनावश्यक वापर टाळा. २. आवश्यकता आणि अनावश्यकता याचा विवेक असू द्या. ३. वस्तूंच्या वापरासाठी आपल्या इच्छा मर्यादित करा. ४. अल्पशा सामूग्रीमध्ये जीवनात संतोष माना. ब्रह्मचर्य तत्वाचे प्रवर्तन करताना महावीर असे म्हणाले की, अब्रह्मचर्येच्या असक्ती ला जिंकल्यानंतर किंवा काम प्रवृत्तीवर विजय मिळवल्यानंतर उर्वरित आसक्तीतून निवृत्त होणे सुलभ होते. महासागरात पोहोचल्यानंतर दीत पोहणे कठीण असत नाही. ब्रह्मचर्य हा शाश्वत धर्म आहे व त्याच्या पालनासाठी १. वक्तव्यावर बोलण्यावर संयम ठेवा. २. शुद्ध सात्विक आहार ग्रहण करा. ३. दृष्टीचा संयम असू द्या, विकार सहित दृश्य पाहू नका. ४. स्मृतीचा संयम असू द्या. भूतकाळातील असंयमाच्या स्मृती चे आवर्तन करू नका. ५. पाचही इंद्रियावर, व त्यांच्या सर्व विषयांवर आपले नियंत्रण असू द्या. ६. गृहस्थांनी अधिक आसक्ती न ठेवता स्वदार संतोष व्रत धारण करावे. आत्म दर्शनाचा अभ्यास करा, स्वयंकेंद्रित व्हा,आत्मलीन व्हा,स्वतःमध्ये सतत रममाण होणे हेच ब्रह्मचर्य आहे. अपरिग्रहाच्या सिद्धांताचे भगवान महावीरांनी विस्तृत विवेचन केले. परिग्रहात आसक्त मानव वैर वाढवतो त्यासाठी पदार्थावर आसक्ती ठेवू नका अनासक्ती शाश्वत धर्म आहे. त्याच्या पालनासाठी शब्दावर आसक्ती ठेवू नका, रूपावर आसक्त होऊ नका, रस सौंदर्यावर आसक्ती ठेवू नका, स्पर्शाने आसक्त होऊ नका. आसक्ती आणि त्याच्या कारणांपासून दूर राहणे हाच अपरिग्रह आहे. परिग्रहाने हिंसा वाढते व अकारण संग्रह केल्याने जीवांमध्ये द्वेषभावना वैरभावना वाढतात. भगवान महावीरांनी मुनी धर्माच्या स्थापनेनंतर गृहस्थ धर्माची व्याख्या केली. भगवान म्हणाले, गृहस्थ हा परिवार समाज, राज्य, आदिं पासून मुक्त होऊ शकत नाही तरीही त्याने आंशिक प्रमाणात व्रतांचे पालन आवश्यक करावे. १. मोठ्या हिंसेचा त्याग करावा २. महान असत्याचा त्याग करावा. ३. चोरीचा प्रयत्न करू नये. ४. स्वदारसंतोष व्रत धारण करावे. ५. परिग्रह संग्रह सीमित असावेत. या प्रथांच्या पाठबळासाठी काही सहाय्यक व्रतांचा अभ्यासही भगवंतांनी सांगितला. १. सर्व दिशांना जाण्याची मर्यादा ठरवून त्या बाहेर जाऊन हिंसा आणि व्यवहाराचा त्याग करावा. २. सीमा बाह्य वस्तूंचा उपभोग टाळावा. ३. अनावश्यक वस्तूंचा उपभोग घेऊ नये. ४. समतेचा अभ्यास असावा. ५. दैनिक व्यवहाराची सीमा निर्धारित करावी. ६. आत्म उपासनेसाठी नित्य क्रमात वेळ द्यावा. ७. त्याग तपश्चर्या संयम पूर्वक उपासना व्रत अंगीकारावे. मिथ्यात्व,आसक्ती, आणि भोग लालसेने जखडलेल्या माणसांनी वाणी संयम,अनासक्ती, अपरिग्रहाचा पडताळा पाहिला, प्रकाश पाहिला आणि हजारो व्यक्ती भगवान महावीरांचा उपदेश शिरसावंद्य मानून शिरोधार्य मानण्यास प्रवृत्त झाले. भयानक परिस्थितीमुळे विचारांना एक नवी दिशा मिळाली आणि भौतिक गोष्टी असार मानून लोक प्रवृत्ती मार्गाचा त्याग करून निवृत्तीच्या मार्गाकडे अहिंसेकडे वळले. मनुष्य स्वतःच स्वतःचा भाग्यविधाता आहे. सुख दुःखास स्वतः कारणीभूत आहे. तो ईश्वरीय सत्तेने संचालित नाही. आत्मा हाच परमात्मा आहे. त्यात ईश्वर वेगळा नाही. आत्मसाधने द्वारा कर्ममुक्त होणारा ईश्वर बनतो. भगवंतांनी उपदेशातून व्यक्तीतल्या निद्रिस्त परमात्म्यास जागृत केले. कर्माने पीडित जनतेस भगवंतांनी प्रेरणा दिली. याबाबत भगवान महावीर म्हणाले की पुरुषा! तू स्वतः पराक्रम कर, जो मनुष्य आपल्या शक्तीचा उपयोग करत नाही, तो आपल्या दैवी प्राप्तीपासून वंचित राहतो. अवयव थकत नाहीत तोपर्यंत संयम साधना करा. भगवंतांनी दैववाद स्वीकृत केला नाही परंतु त्यांनी पुरुषार्था पासून दूर जाणाऱ्या जनतेस दैववादाच्या, भाग्यवादाच्या बेडी तून मुक्त केले. भगवंतांच्या वाणीतून समन्वयाची धारा प्रवाहीत झाली. त्यात दैवाला स्थान नाही, एकट्या पुरुषार्थासही स्थान नाही. तर भाग्य आणि पुरुषार्थ दोहोंची संगत हीच त्या धारेचा मुख्य प्रवाह आहे. या प्रवाहानेच भारतीय जनतेस चमत्कार व कर्मण्यता, अनिष्ठ रूढींपासून मुक्त पुरुष आणि जागृती वाढवली त्यातच भारतीय जनता भारतीय आत्मा प्रफुल्लित झाला. या प्रकारे भगवान महावीरांनी केवल ज्ञान किंवा कैवल्य अर्थातच सर्वज्ञतेच्या प्राप्तीनंतर तीस वर्षांपर्यंत हिंसा व कर्माने पीडित जनतेस सत्य मार्गाचा उपदेश केला. शाश्वत अशा सुख प्राप्ती करणाऱ्या धर्माची त्यांनी व्याख्या केली, याच क्रमात त्यांनी जनजनांचा उद्धार केला. जनतेच्या अनेक जिज्ञासांचे समाधानही केले. भगवान महावीरांनी प्रतिपादन केलेल्या सर्वच तत्वांचे दर्शना एका छोट्याशा लेखांमधून करणे अशक्य आहे. त्यासाठीच भगवंताच्या उपदेशाचा प्रमुख भाग या ठिकाणी नोंदीत केला आहे. भगवंताच्या उपदेशातून असंख्य असे प्रकांड पंडित,विद्वान शिष्य निर्माण झाले. त्यामध्ये प्रमुख गौतमस्वामी, सुधर्मा स्वामी इत्यादी अकरा असे मुनी समुदायाचे नायक म्हणजेच गणधर पंडित होते. या सर्व आचार्यांचे मिळून ४४०० शिष्य होते. या आचार्यांनी आणि शिष्यांनी त्यातील उपाध्याय मंडळींनी पुढे भगवान महावीराच्या उपदेशाचे शास्त्रांमध्ये मांडणी केले. तेच जैन आगम ग्रंथ म्हणून आज प्रकाशित आहेत. केवलज्ञान अर्थात सर्वज्ञता प्राप्तीनंतर भगवान महावीरांचे जीवन केवळ समस्त जीव जातीच्या आत्म ऊद्धारासाठी आणि कल्याणासाठी अहिंसा,सत्य,शांती,अपरिग्रह, ब्रह्मचर्य या तत्वांचा उपदेश करण्यातच सत्कारणी लागले. वयाच्या ७२ व्या वर्षी भगवंतांचे कार्तिक कृष्णा अमावस्ये च्या दिवशी पावापुरी ( आजचे नालंदा जिल्हा, बिहार ) येथे महानिर्वाण झाले. भगवान महावीरांची अहिंसा योध्याची अहिंसा आहे ज्याने भगवान महावीरांचे चरित्र पूर्ण जाणले तो अहिंसेस भ्याडपणा म्हणण्याचे धाडस करणार नाही. अभय आणि पराक्रम त्यांच्या अहिंसेस जोडलेला आहे. भगवान महावीरांची निवृत्ती अकर्मण्यता नाही ती कर्मावरील विजयाची अजिंक्य अशी शक्ती जागृत करणारी महान गाथा आहे. म्हणूनच भगवंताच्या वाणीमध्ये विश्वशांतीच्या पथ दर्शनाची क्षमता आहे. ( संपर्कः 9420015108)


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *