Ganpati Special Trains: गणेशोत्सव वाढीव रेल्वेगाड्यांची प्रवाशांना प्रतीक्षा; कोकण रेल्वेचे मात्र 'वेट अ‍ॅंड वॉच'

Mumbai : गणेशोत्सवाला जेमतेम दहा दिवस शिल्लक असताना, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत. कोकणात उत्सवानिमित्त प्रवासाची मागणी वाढल्याने मध्य रेल्वेने आणखी ३६ रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. मात्र जागेच्या अनुपलब्धतेमुळे कोकण रेल्वेने ‘थांबा आणि पाहा’ भूमिका घेतली आहे. यामुळे वाढीव रेल्वेगाड्यांसाठी कोकणवासींची प्रतीक्षा कायम आहे.

मुंबई-गोवा हा रस्ते प्रवास खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. उत्सवकाळातील पाऊस आणि महामार्गावरील खड्डे पाहता, रस्ते प्रवास अधिकच त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. यामुळे प्रवाशांची रेल्वेगाड्यांना पसंती आहे. या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल येथून कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेने नियमित रेल्वेगाड्यांसह २२२ विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे. दोन्ही प्रकारांतील रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांकडून गाड्यांबाबत सातत्याने विचारणा होत आहे.

Pimpri : पवना धरण काठोकाठ भरुनही पाणीपुरवठा दिवसाआडच; काय आहे नेमके कारण?

उत्सवकाळात प्रवासी गर्दी विभागण्यासाठी पनवेलपासून कोकणातील विविध स्थानकांपर्यंत आणखी ३६ रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार आहे. मात्र कोकण रेल्वेमार्गावर रेल्वेगाड्या चालवण्यासाठी जागा नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विशेष गाड्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोकण रेल्वेमार्गावर जागेची मर्यादा असून, मुंबईसह पुणे, मुंबई सेंट्रल, पुणे येथूनही रेल्वेगाड्या कोकणात दाखल होत आहे. यामुळे अतिरिक्त गाड्यांच्या मुद्द्यावर ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेतली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

समाजमाध्यमांवर बोरिवली गाडीची हवा

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांच्या सुविधेसाठी बोरिवली आणि वांद्रे स्थानकावरून कोकणात रेल्वेगाडी सुरू होणार असल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर आहे. बोरिवली ते मडगाव रेल्वे सुरू होणार असल्याचे फलक प्रवासी संघटनांच्या विविध समूहांमध्ये व्हायरल होत आहेत. मात्र गाडी नेमकी कधी आणि केव्हा सुरू होणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बोरिवलीहून सुटणाऱ्या गाडीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *