Pune : जेवणानंतर पाणी प्यायला गेलेल्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; कृषी विद्यालयात धक्कादायक घटना

Pune : कृषी महाविद्यालयातील ‘मेस’मधील जलशुद्धीकरण यंत्रातून (आरओ) विजेचा तीव्र धक्का बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुरक्षा विषयक उपाययोजनांकडे काणाडोळा आणि गंभीर हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, आष्टी, बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कृषी महाविद्यालयात ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

चैतन्य १४ मार्चला मेसमधील कामकाज पाहत होता. जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित सुरू आहे का, याची तपासणी करताना अचानक यंत्रात विद्युत प्रवाह उतरला. विजेचा धक्का बसल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

सुरक्षा उपाययोजनांचा अभाव
मेसमधील उपकरणांची योग्य देखभाल न करणे, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरातील विद्युत सुरक्षेचे लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) तातडीने करावे, तसेच जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

ही अतिशय दुखःद घटना आहे. चैतन्य चव्हाण याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तो बरा व्हावा याकरिता महाविद्यालय, विद्यार्थी अशा सर्वांनी प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने त्यात यश आले नाही. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी माझ्याशी चर्चा केली. या घटनेबाबत अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, ती पाहणी करून सोयीसुविधा अद्ययावत करण्याबाबत अहवाल देईल. - डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ



गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune : जेवणानंतर पाणी प्यायला गेलेल्या २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; कृषी विद्यालयात धक्कादायक घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *