Baramati Bypoll Election : बारामतीत राजकीय हालचालींना वेग; बिनविरोध की निवडणुकीची रणधुमाळी?

Pune : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बारामती आणि राहुरी या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. तसेच भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे गेल्यावर्षी निधन झाल्यामुळे राहुरी मतदारसंघाचीदेखील जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाकडून या दोन्ही विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी असे मत मांडले आहे. सर्वांनी एकमताने याबाबत निर्णय घ्यावा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच विरोधकांनी ही निवडणूक आमच्यावर लादली तर आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रणांगणात उतरु, असंदेखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता विरोधक काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ. पण अद्याप तरी या संदर्भात कुठला प्रस्ताव सत्ताधारी पक्षांकडून आलेला नाही. याआधी अशा घटना घडल्या तेव्हा आम्ही अनेक ठिकाणी बिनविरोध विचार केला. पण त्यांनी उमेदवार उतरवले. नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी सरसकट बिनविरोध झाल्याचं यापूर्वी निर्णय झाल्याची मला माहिती नाही", अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

नाना पटोले काय म्हणाले?
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. "अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. आताच निवडणूक जाहीर झाली आहे. आम्ही सर्वजण चर्चा करुन निर्णय घेऊ", अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आपली भूमिका मांडली आहे. "बारामतीचा विषयच नाही. मी आधीही बोलले आहे की, आमच्याकडून सुनेत्रा वहिणी यांच्याविरोधात उमेदवार देण्याचा विषयच येत नाही. अर्थातच आम्ही पोटनिवडणूक लढणार नाहीत. महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कधीच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही", अशी भूमिका त्यांनी मांडली.

संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनीदेखील आपल्या पक्षाच्या भूमिका मांडली आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधीमंडळात जाणार आहेत. तिथे कदाचित सर्व प्रमुख राजकीय पक्षांसोबत त्यांची चर्चा होईल. पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही बिनविरोध म्हणता तेव्हा महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांचं काय? याचंही उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद न देणं यासारखा मोठा नक्षलवाद नाही", अशी टीका संजय राऊत यांनी केली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *