Mumbai : मुंबईत २० टक्के हॉटेल बंद; युद्धामुळे पुण्यातील हॉटेल उद्योगालाही मोठा फटका

Mumbai : इराण युद्धामुळे पश्चिम आशिया तसेच आखाती देशांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरवठा साखळी खंडित झाली असून याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायावरही झाला आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींत वाढ झाल्याने स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना घरगुती वापराच्या सिलिंडरच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्यास सांगितलं असल्याने त्याचा परिणाम मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना जाणवू लागला आहे.

व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ज्या हॉटेलांकडे सिलिंडरचा साठा नव्हता अशी जवळपास २० टक्के उपहारगृहे सोमवारपासूनच बंद असल्याचे निदर्शनास आले. ही परिस्थिती कायम राहिल्यास आज, मंगळवारपासून ७० ते ८० टक्के उपहारगृहे बंद होतील असा अंदाज 'आहार इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन' या संघटनेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

'आहार' संघटनेशी आठ हजार हॉटेले, रेस्तराँ, फाइन डाइन, कॅफेटेरिया संबंधित आहेत. यातील मुंबईतील अनेक हॉटेल सोमवारीच सिलिंडर पुरवठ्याशिवाय बंद झाल्याची माहिती 'आहार'चे २०२५-२६ चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिली.

'आहार' ही राज्यभरातील ६६ हॉटेल असोसिएशनची पालक संस्था आहे. या सगळ्याच संस्था घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्याच्या निर्बंधांना तोंड देत असून यावर सध्या तरी कोणताही उपाय नसल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेल व्यवसायावर चार लाख लोक थेट उपजीविकेसाठी अवलंबून आहेत.

पुण्यातही युद्धाची धग हॉटेलच्या चुलींना

पश्चिम आशियात भडकलेल्या युद्धाची धग थेट पुण्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या भटारखान्यात पोहोचली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद केला आहे. त्याचा सर्वांत मोठा फटका आदरातिथ्य व्यवसायाला बसणार आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया पुणे चॅप्टरचे अजिंक्य उडाणे म्हणाले, ‘व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा मोठा तुटवडा आहे. रेस्टॉरंट व हॉटेल उद्योग पूर्णपणे एलपीजीवर अवलंबून आहे. मात्र, तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा जवळपास बंद केल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. गॅस एजन्सींकडे केवळ एक ते दोन दिवस वितरण करता येईल, एवढाच सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर संघटनेने पेट्रोलियम मंत्रालयाकडे निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही.

ऑल इंडिया गॅस वितरक संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण खंडाळकर म्हणाले, ‘तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. केवळ घरगुती ग्राहकांनाच एलपीजी सिलिंडर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घरगुती ग्राहकांना केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरात सोमवारीही अनेक ग्राहकांनी गॅस एजन्सींच्या कार्यालयात गर्दी केली होती.’ दरम्यान, गॅस बुकिंग यंत्रणा विस्कळित असल्याच्या तक्रारी ग्राहक करत होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *