एन. रघुरामन यांचा कॉलम:दुसऱ्याच्या हानीतून मिळवलेली संपत्ती हा एक पोकळ विजय

एकदा एका माणसाने एका चिमणीला पकडले. चिमणीने ‘आपल्याला जीवदान द्यावे. त्या बदल्यात तीन धडे शिकवेल. यातून तुमचे जीवन सुधारेल,’ अशी याचना चिमणीने केली. चिमणी किलबिलाट करत म्हणाली, “तुम्ही मला मुक्त केले तर मी तुम्हाला पहिला धडा शिकवेन. दुसरा धडा मी माझ्या समोर असलेल्या त्या झाडावर बसेन तेव्हा देईल. आणि तिसरा मी आकाशात उडेन तेव्हा देईल.’ मग त्या व्यक्तीने उत्सुकतेने तिची सुटका केली. चिमणी जवळच्या कुंपणावर बसली आणि त्याला पहिला धडा शिकवला : भूतकाळाबद्दल कधीही शोक करू नका; तो वेळेचा अपव्यय आहे. त्या व्यक्तीने खांदे उडवले आणि म्हटले की त्याला अशा गोष्टी आधीच माहीत आहेत. मग चिमणी एका उंच फांदीवर उडून गेली आणि त्याला दुसरा धडा शिकवला : तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी सत्य पाहत नाही तोपर्यंत कधीही कोणावरही विश्वास ठेवू नका, भलेही तो जवळचा का असेना. या वेळीही त्या व्यक्तीने त्यास क्षुल्लक म्हणून फेटाळून लावले. मग पक्ष्याने खाली पाहिले आणि म्हणाला, “तू खूप मोठी चूक केली आहेस. माझ्या शरीरात दोन मोठे हिरे आहेत. तू मला मारले असतेस तर तू पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत माणूस असतास. त्या व्यक्तीचे हृदय पिळवटून गेले. त्याने आपल्या चुकीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि पश्चात्ताप केला. मग त्याने वर पाहिले आणि तिसरा धडा मागितला. या आशेने की किमान एक तरी त्याला उपयुक्त ठरेल. पक्षी म्हणाला, “मी तुला तिसरा धडा का शिकवू? तू आधीच्या दोन धड्यांकडे दुर्लक्ष केलेस. तू भूतकाळाबद्दल दु:ख व्यक्त केलेस आणि एका चिमणीत दोन मोठे हिरे असू शकतात या अशक्य गोष्टीवरही विश्वास ठेवला. मनुष्याने आपल्या प्रगतीसाठी ज्ञान मिळवले होते. भौतिक संपत्ती गोळा केली होती. परंतु ती वापरण्याची बुद्धी त्याने गमावली आहे,’ असे म्हणत पक्षी उडून गेला. या शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल वाचताना मला ही बोधकथा आठवली. हा खटला एका मुलाशी संबंधित होता. त्याने “हिऱ्या’सारख्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या आमिषाने आपल्या वडिलांच्या मालमत्तेच्या एक तृतीयांश भागावर दावा केला. वडिलांनी विरोध केला. तेव्हा वाद घालण्याऐवजी किंवा कौटुंबिक कर्तव्याचा उल्लेख करण्याऐवजी मुलाने कायद्याचे ज्ञान शस्त्र म्हणून वापरले आणि मानसिक आरोग्यसेवा कायद्याच्या तरतुदींचा वापर करण्यासाठी याचिका दाखल केली. त्याने आपल्या वडिलांच्या मानसिक स्थितीची स्वतंत्र मूल्यांकनाची मागणी केली. आणि अशा प्रकारे वृद्धाची त्याला आव्हान देण्याची कायदेशीर क्षमता हिरावून घेतली. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती फरहान दुबाश यांनी ही चाल लक्षात घेतली. मुलाची याचिका कायदेशीर प्रतिकाराच्या मुळावर प्रहार करण्याचा स्पष्ट प्रयत्न होता. एमएचएला कमकुवत करणे आणि असुरक्षित व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी ढाल म्हणून केले होते. परंतु मुलाने त्याचा वापर तलवारीसारखा करून वडिलांचा कायदेशीर दर्जा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुलासाठी त्याचे वडील आता पालक राहिले नाहीत तर केवळ मालमत्तेमधील अडथळा होते आणि त्याच्या सर्व युक्त्या लोभातून जन्माला आल्या होत्या. ही कायदेशीर लढाई चिमणीने दिलेल्या इशाऱ्याला अधोरेखित करणारी आहे. माणसाने भौतिक प्रगतीसाठी ज्ञान मिळवले, परंतु आपला विवेक हरवून टाकला. चिमणी असो किंवा इतर कोणताही पक्षी... ते स्वतःच्या पिल्लांना वाढवण्यासाठी कधीही दुसऱ्या पक्ष्याचे घरटे नष्ट करत नाहीत. परंतु मुलगा वडिलांच्या विचारसरणीत कायदेशीर त्रुटी शोधू लागतो तेव्हा तो कुटुंबाचा वारसा याकडे ताब्यात घेण्यायोग्य मालमत्ता म्हणून बघू लागतो. तेव्हा त्या चिमणीचे म्हणणे खरे वाटते. 10 मार्च 1876 रोजी ग्रॅहम बेलने टेलिफोनचा शोध लावला. 1887 मध्ये जर्मन-अमेरिकन शोधक एमिल बर्लिनर यांनी फ्लॅट-डिस्क ग्रामोफोन तयार केला. 3 एप्रिल 1973 रोजी मोटोरोला अभियंता मार्टिन कूपर यांनी पहिला हाताळता येणारा मोबाइल फोन विकसित केला होता. ध्वनी क्षेत्रातील हे सर्व शोध मानवी प्रजातीकडे ज्ञान असल्यामुळे शक्य झाले. परंतु त्याच मानवी प्रजातीचा एक मुलगा त्याच्या घरात राहणाऱ्या आपल्या वडिलांचा आवाज ऐकू शकत नाही. म्हणूनच माणूस म्हणून आपण बुद्धी गमावून बसलो आहोत ही बाब एका चिमणीलादेखील समजते असे म्हणावे लागते. फंडा असा की - संपत्तीचा लोभ सर्वात “शिक्षित’ व्यक्तीलादेखील एका क्षणात मूलभूत तर्कशुद्ध आणि नैतिक तत्त्वांविषयी अंध बनवू शकतो.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *