पवन के. वर्मा यांचा कॉलम:गुलामगिरीची प्रतीके हटवण्याचे आपण स्वागत करायला हवे

तसे तर मी नवी दिल्लीतील रस्ते, पुतळे आणि इमारतींमध्ये सरकारने केलेल्या प्रत्येक बदलाचे समर्थन करत नाही. उदाहरणार्थ, राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ का केले गेले, हे मला समजत नाही. मुघल गार्डन्सचे नाव बदलून अमृत उद्यान का केले गेले, हेही मला उमजलेले नाही, कारण ते उद्यान मुघल शैलीतच बांधलेले आहे. परंतु या महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात एडविन लुटियन्सच्या जागी सी. राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले, तेव्हा मला खूप आनंद झाला. लुटियन्स हे नक्कीच एक प्रतिभावान वास्तुविशारद राहिले असतील, पण ते निःसंशयपणे वर्णद्वेषी होते. भारतीयांबद्दल त्यांच्या मनात कमालीचा तिरस्कार होता, जो त्यांनी कधीही लपवून ठेवला नाही. याचा सबळ पुरावा 1985 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द लेटर्स ऑफ एडविन लुटियन्स टू हिज वाइफ लेडी एमिली’ या पुस्तकात मिळतो. भारतातील कोणतीही गोष्ट लुटियन्सला प्रभावित करू शकली नव्हती - ना वास्तुकला, ना तत्त्वज्ञान, ना संस्कृती आणि येथील लोकांच्या त्वचेचा रंग तर मुळीच नाही. इंदूरच्या डेली कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना एका वर्णद्वेषी शब्दाने संबोधित केले होते. वाराणसीत त्यांना असे आढळले की येथे ‘सर्व काळे लोक, सर्व प्रकारचे काम करतात’. मद्रासच्या लोकांसाठी तर त्यांनी अधिक अभद्र टिप्पणी केली. त्यांनी लिहिले की, ‘भारताच्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही.’ भारतीय धर्मांत त्यांना कोणतीही बौद्धिकता दिसली नाही. आपल्या खाजगी कर्मचाऱ्यांच्या नावांवरही ते टोमणा मारण्यास विसरले नाहीत. ते म्हणाले, ‘हे लोक त्या सर्व हालचाली करतात, ज्यामुळे कोणताही गोरा साहेब कंटाळू शकतो.’ भारतीय वास्तुकलादेखील त्यांना प्रभावित करू शकली नाही. वाराणसीच्या घाटांच्या काठावरील मंदिरे त्यांना ‘मुलांच्या खेळण्यांमधील झाडांसारखी’ वाटली. कुतुबमिनारची घडण त्यांच्या मते निष्काळजी आणि बेढब होती. मुंबईतील होळकरांचा राजवाडा त्यांना अभद्र व उदयपूरचा राजप्रासाद त्यांना आदिम वाटला होता. ताजमहाललाही त्यांनी नाकारले. तो ग्रीक व रोमन कलाकृतींच्या जवळपासही टिकत नाही, असे म्हटले. शिल्पकारांबद्दल त्यांची टिप्पणी होती की, ‘यांना ओबडधोबड नमुने व देवमूर्ती बनवण्याशिवाय काहीच येत नाही.’ एका बांधकामाच्या अंतिम टप्प्यात कामाची पाहणी करताना त्यांनी लिहिले की, ‘निष्काळजी भारतीय नेहमीप्रमाणे गोष्टी वाया घालवत होते आणि गोंधळ पसरवत होते.’ त्यांना आपल्या पत्नीसाठी बुद्धमूर्ती खरेदी करायची होती, पण त्यांना काहीही दर्जाच्या अनुरूप वाटले नाही. त्यांनी लिहिले - ‘हे देवा, येथे सर्व काही किती कुरूप आहे!’ इतकेच काय, राष्ट्रपती भवनाचा भव्य घुमटदेखील लुटियन्सने अशा प्रकारे कल्पिला होता की, तो ‘ब्रिटिश सैनिक, अधिकारी, मिशनरी किंवा व्हाइसरॉयच्या टोपी घातलेल्या डोक्याची प्रतिमा’ निर्माण करेल, तर लुटियन्सचे समर्थक याला भारतीय वास्तुकलेतून प्रेरित असल्याचे सांगतात. या सर्व अवतरणांवरून स्पष्ट होते की, आपण भारतीय आणि आपल्या महान सभ्यतेबद्दल लुटियन्सची वृत्ती एका अशिक्षित, दुष्ट बुद्धीच्या आणि वर्णद्वेषी व्यक्तीसारखी होती. अशा परिस्थितीत खुद्द राष्ट्रपती भवनात लुटियन्सचा पुतळा असणे हे आपल्या वसाहतवादी विस्मृतीचे एक दयनीय प्रतीक होते. हे पूर्णपणे योग्य आहे की आता लुटियन्सचा पुतळा हटवून त्या चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा पुतळा स्थापित करण्यात आला आहे, जे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव गव्हर्नर-जनरल होते. राजाजी हे एक सच्चे गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांना मद्रास प्रेसिडेन्सीचे प्रीमियर, पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून व्यापक राजकीय-प्रशासकीय अनुभव होता. ते विचारवंत आणि लेखकही होते. त्यांचे साहित्यिक योगदान - ज्यात रामायण आणि महाभारताच्या अनुवादांपासून ते संस्कृती आणि राजकारणावरील वैचारिक निबंधांपर्यंतचा समावेश आहे - भारतीय बौद्धिक परंपरेला अधिक समृद्ध करते. आपण असे प्रजासत्ताक आहोत, ज्याला आपली सार्वजनिक स्मृती आपल्याच मातीत रोवायची आहे. आपण सरकारचे या निर्णयासाठी अभिनंदन करायला हवे, जो निर्णय वसाहतवादी इमारती बांधणाऱ्याच्या ऐवजी राष्ट्राच्या अंतर्मनाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या स्मृतीला समर्पित आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लुटियन्स दिल्लीचा एक पैलू हादेखीलहे पूर्णपणे योग्य आहे की, लुटियन्सचा पुतळा हटवून त्या सी. राजगोपालाचारी यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे, जे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव गव्हर्नर जनरल होते. ते एक सच्चे गांधीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक होते.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *