‘वंदे मातरम’ नाही म्हटलं तर जेलमध्ये टाकणार का? विचारणाऱ्या आव्हाडांना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले “हा दोष आपल्या…”

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, असा आदेश दिल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, असा इशारा देत कोणी काय खावं, काय घालावं, काय बोलावं हे तुम्ही ठरवणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. आम्ही तसं म्हटलं नाही, तर जेलमध्ये टाकणार का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला मुनगंटीवारांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

“हॅलो शब्द १८ व्या शतकात आला. आश्चर्य व्यक्त करणं असा त्याचा अर्थ होतो. इंग्रजांची ही आठवण पुसून काढली पाहिजे. आपल्या मराठी पुस्तकात वंदे मातरमचं सुंदर वर्णन करण्यात आलं आहे. देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रापेक्षा देशभक्ताच्या ओठातून निघालेलं वंदे मातरम प्राणप्रिय आहे,” असं मुनगंटीवार म्हणाले.

“जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद साधू, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करु. हा काही जातीय, धर्मांध शब्द नाही,” असंही त्यांनी सांगितलं. “मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात हे अभियान चालवायचं आहे. शिवसेनेचं किंवा इतर कोणत्या पक्षांचं काय म्हणणं आहे हे गौण आहे,” असं त्यांनी म्हटलं.

आव्हाडांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले “हे अभियान आहे. कोणत्याही व्यक्तीला कायदा करुन आम्ही जेलमध्ये टाकू असं सांगितलेलं नाही. हा आपल्या शिक्षणपद्धतीचा दोष आहे की, योग्य अर्थ काढण्याची क्षमता आपण विकसित करु शकलो नाही. हॅलो शब्दाला पर्यायी शब्द म्हणून वंदे मातरम वापरावं इतकंच म्हटलं आहे. यामध्ये श्वास आणि इतके मोठे शब्द वापरण्याची गरज नव्हती”.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *