मुंबई : ‘सेना-राष्ट्रवादीने व्यभिचार केला अन्…’, मनसेची जोरदार टीका

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाड्याच्या सभेत भाजपचं तोंडभरून कौतुक केलं. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेवर  कडाडून टीका केली. त्यानंतर राज ठाकरेंनी भाजपसोबत अघोषित युती केल्याचं बोललं गेलं. तशी टीका इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील केली. त्यालाच आता संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्यभिचार केला तरी यांना प्रश्न विचारायचे नाही, असं देशपांडे म्हणाले.

सध्या भाजप आणि मानसेमध्ये युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात काय होईल माहिती नाही. पण, शिवसेना आणि राष्ट्रवादीने लोकसाक्षीने व्यभिचार केला तरी यांना प्रश्न विचारायचे नाही. आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेना नेत्यांनी टीका केली. भाजपच्या 'प्रवक्त्यांनी' केलेली सभा पाहिली. भाजपची बी टीम एमआयएम होती ते माहित होते, भाजपची सी टीमपण आहे हे आज दिसले. आधी आपला रंग ठरवा, मग दिशा ठरवा. भाजपची सुपारी घेऊन मराठी माणसाच्या मुळावर येऊ नका, असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या होत्या. तसेच आदित्य ठाकरेंनी देखील मनसे भाजपची सी टीम असल्याची टीका केली.

भाजप सर्वात मोठा पक्ष असून सत्तेबाहेर आहे. जनतेनी भाजप-शिवसेनेच्या युतीला मत दिलं होतं. तुम्हाला राष्ट्रवादीसोबत संसार थाटण्यासाठी मत दिलेलं नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. तसेच उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपला बहुमत मिळालं. कारण तिथे विकास होत आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं. तसेच राष्ट्रवादी जातीपातीचं राजकारण करत असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. त्यानंतर भाजप आणि मनसेची अघोषित युती झाल्याची टीका राजकीय वर्तुळातून झाली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *