पुणे : राजकीय हेतुनं राऊतांवर ईडीची कारवाई : आदित्य ठाकरे

पुणे : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडीची (ED) कारावाई राजकीय हेतुने करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच अशा प्रकारे कारवाई करणे म्हणजे देशात लोकशाही उरली आहे की नाही ? असा प्रश्नदेखील आदित्य यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राजकीय सूडभावनेतून ईडीच्या कारवाया सुरू आहेत. पण शिवसेना अशा कारवायांमुळे थांबणार नाही. आम्ही लढा देऊ, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. धमक्या देऊन कारवाई होऊ लागल्या आहेत हे अतिशय धोक्याचे असून, त्यामुळे देशात आता लोकशाही आहे की नाही यावर विचार करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ईडीच्या कारवाईनंतर राऊत यांनी आपण एक पैशाचाही घोटाळा केलेला नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला असून, एक पैशाचा घोटाळा नसल्याचा पत्रकारांना सांगून काही फायदा नाही असा चिमटादेखील चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना काढला आहे. तसेच जर काही घोटाळा नसेल तर, त्यांनी न्यायालयात जावे आणि सिद्ध करावे.

राऊतांच्या एक पैशाच्या घोटाळा नाही अशा विधानावर जनतापण विश्वास ठेवणार नाही असेदेखील पाटील म्हणाले. सत्तेत असल्यापासून आणि आता राऊत वापरत असलेल्या शब्दांचे पुस्तक काढण्याचे काम आपण एकाला दिले आहे. तसेच राऊत वापरत असलेले शब्द महाराष्ट्रातल्या संस्कृतीत बसतात का? असा प्रश्न सामान्य जनतेला विचारणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राऊत अशाप्रकारे बोलणे हे नवीन नसल्याचे सांगत राऊत आपल्यावर अनेकदा बोलले आहेत. त्यामुळे त्यांना जे संस्कार आहेत त्याप्रमाणे ते बोलतात असेदेखील पाटील यांनी म्हटले आहे. राऊत यांच्यावरील कारवाई जर चुकीची असेल तर, न्याय व्यवस्था काही विकली गेलेली नाही. त्यामुळे या कारावाईविरोधात ते न्यायालयात दाद मागू शकतात, असेदेखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *