एन. रघुरामन यांचा कॉलम:कमाईचे आधुनिक मार्ग जुन्या आणि छोट्या व्यवसायांमध्ये चैतन्य निर्माण करू शकत नाहीत

नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यात मी एका अशा शहरात होतो, ज्याची शहरी रचना पूर्णपणे बदलली होती. मी अनेक किलोमीटर पसरलेल्या मेट्रोच्या महाकाय खांबांखालून गेलो, तेव्हा त्यांची सावली खाली संथ चालणाऱ्या गाड्यांवर पडत होती. गुदमरवून टाकणाऱ्या ट्रॅफिकमध्ये मी माझ्या मित्राला विचारले, ‘इथे आधी जे लोक असायची, त्यांचे काय झाले? कोल्ड ड्रिंकवाले, शहाळे विकणारे आणि फळांचे स्टॉल लावणारे- जे या खांबांच्या आधी इथे उभे असायचे?’ मित्राने उत्तर दिले की, ‘एखाद्या शहराच्या विकासासाठी जुन्या गोष्टींना बाजूला व्हावेच लागते.’ पूर्णपणे आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्याचे म्हणणे बरोबर होते. पुणे महानगरपालिकेला कमाईचा एक फायदेशीर आणि नवीन मार्ग सापडला आहे. या खांबांवरील जाहिरातींमधून पालिकेने दोन वर्षांत 3.4 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. ऑक्टोबर 2024 ते मार्च 2026 दरम्यान ही कमाई सातत्याने वाढली. जसजसा मेट्रोचा विस्तार होईल, तसतशी ही कमाई आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. तरीही, जेव्हा महानगरपालिका दरवर्षी शुल्क वाढवत आहे, तेव्हा या ‘प्रगती’ची खरी किंमत काय आहे, असा विचार केल्याशिवाय राहवत नाही. हा बदल मला नागपूरची आठवण करून देतो. 50 वर्षांपूर्वी पुणे आणि नागपूर सायकलींसाठी ओळखले जायचे. आज सायकली खूप कमी दिसतात. अनेक वर्षांनंतर जेव्हा मी नागपूरच्या सीताबर्डीला परतलो, तेव्हा मी लगेच त्या पंक्चर काढणाऱ्याला शोधले, जो कधीकाळी एका कोपऱ्यात बसायचा. माझ्यासोबत असलेल्या व्यक्तीला तो कुठे गेला हे माहीत नव्हते. तो म्हणाला की, आता हा व्यवसाय चालवण्यासाठी सायकलीच फार कमी उरल्या आहेत. मी जुन्या पिठाच्या गिरण्या आणि त्या पत्र्याच्या कारागिरांबद्दल विचारले, जे तेलाच्या डब्यांना किचनच्या डब्यांमध्ये बदलायचे. पण उत्तर तेच होते की, ‘आता स्वतः धान्य कोण दळतं?’ किंवा ‘साठवणुकीच्या पद्धती तर खूप आधीच बदलल्या आहेत.’ मनात जिद्द धरून मी दोन दिवस शोध घेतला आणि शेवटी त्या जुन्या पंक्चर काढणाऱ्या माणसाला शोधून काढले. तो आपल्या कुटुंबासह एका छोट्या झोपडीत राहत होता. शालेय जीवनात माझी सायकल अगदी कमी खर्चात दुरुस्त ठेवल्याबद्दल मी त्याचे आभार मानले. त्या वेळच्या अनेक मोफत दुरुस्त्यांच्या बदल्यात जेव्हा मी काही पैसे त्याच्या खिशात ठेवले, तेव्हा त्याला रडू कोसळले. गल्लीतून परतताना मला जाणवले की, तिथे कधीकाळी जी वर्दळ असायची, ती आता गायब झाली आहे. जर तुम्ही तुमच्या शाळेबाहेर काही नाण्यांमध्ये मीठ लावलेली उकडलेली ‘बोरे’ देणाऱ्या आजींना भेटला नसाल, तर एकदा त्यांना नक्की शोधा. त्यांना भेटा. त्यांना नाही, तर तुम्हालाच जास्त चांगले वाटेल. हीच कमतरता मला या वीकेंडला मुंबईत जाणवली. माझ्या गल्लीच्या टोकाला स्नॅक्स आणि फुले विकणारी ‘गजरावाली’ महिला गायब होती. मला सांगण्यात आले की स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींमुळे तिला काम बंद करावे लागले. याच रस्त्यावर दररोज सकाळी एक दूधवाला गेली पंचवीस वर्षे बसतो. संप, पूर किंवा वादळातही तो तिथून कधी एक इंचही हलला नाही. कधीतरी जेव्हा तो येत नसे, तेव्हा केवळ त्याचे ग्राहकच नाही, तर तिथून जाणारा प्रत्येक वाटसरू विचारायचा की, ‘आज दूधवाल्याला काय झाले?’ ज्या गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात, त्या कधीही तात्पुरत्या जाहिराती किंवा नवीन पायाभूत सुविधा नसतात. ती त्या लहान व्यवसायांची अनुपस्थिती असते, ज्यांनी आपल्याला मोठे होताना पाहिले. ही माणसे केवळ दुकानदार नाहीत, तर ते ओळखीचे चेहरे आहेत, जे शहराचा आर्थिक-सामाजिक वेग कायम ठेवतात. कमाईचे आधुनिक मार्ग बांधकामांसाठी पैसा देऊ शकतात, पण जर हे लहान व्यवसाय बंद झाले, तर ते त्या समाजात पुन्हा कधीही चैतन्य निर्माण करू शकत नाहीत. फंडा असा की खरी प्रगती केवळ पायाभूत सुविधा आणि जाहिरातींच्या कमाईवरून मोजली जात नाही. एखाद्या शहराचा प्राण असणारे छोटे आणि सामान्य व्यवसाय आधुनिक विकासामुळे नष्ट होणार नाहीत, याची आपण काळजी घेतली पाहिजे.

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *