एकविरा देवी यात्रेत मोबाईल चोरीचा संशय, वादातून ठाण्यातील भाविकाची हत्या

पुणे : लोणावळ्याजवळील कार्ला येथील एकविरा देवी यात्रेदरम्यान शनिवारी मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी झालेल्या हाणामारीत ठाणे येथील एका भाविकाचा मृत्यू झाला तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. मोबाईल चोरीच्या संशयावरुन गर्दीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी एका गटाकडून बांबू आणि धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, ठाण्यातील ४९ वर्षीय भाविक मनोज पाटील यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेत ते कार्यरत होते. पाटील हे आपले दोन मित्र हर्षल पाटील आणि राहुल पाटील या दोघांसह एकविरा देवीच्या यात्रेला आले होते.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी रस्त्यावर खेळ सादर करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. हे आरोपी यात्रेदरम्यान आपली कला सादर करतात. त्यांची ही कला पाटील आणि त्यांचे मित्र पाहत होते. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका मित्राच्या लक्षात आलं की त्याचा मोबाईल चोरीला गेला आहे. यानंतर त्यानं या खेळ करणाऱ्या मुलांवर चोरीचा आरोप केला. यानंतर त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि त्याचं रुपांतर हिंसक हाणामारीत झालं. या हाणामारीत मनोज पाटीलला अनेक वेळा बांबूनं मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या छातीत धारदार शस्त्रानं वार करण्यात आला. या मारहाणीत हर्षल पाटील आणि राहुल पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

या हाणामारीची माहिती जवळचं सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना खबर मिळण्यापूर्वीच गर्दीचा फायदा घेत आरोपींनी पळ काढला. यामध्ये गंभीर जखमी झाल्यानं मनोज पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा संयुक्त तपास लोणावळा ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण पाटील आणि अजय पाटील या दोन आरोपींना रायगड जिल्ह्यातील पेण इथून ताब्यात घेतलं आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *