अजितदादांचा अपघात धुक्याने की धोक्यानं? राज ठाकरेंचा सवाल

संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आज, शुक्रवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित केले. अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे? याबाबत संशय निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.रोहित पवार यांनी अपघातासंदर्भातील तांत्रिक बाबी मांडल्या असल्या तरी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न करूनही तक्रार स्वीकारली गेली नाही, ही बाब संशयास्पद आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एक अधिकारी एफआयआर लिहित होते, मात्र त्याच वेळी डीसीपी आले आणि तक्रार घेऊ नका असे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. हे नेमके काय सुरू आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यात कुठेही एफआयआर नोंदवू शकता असे सांगितले जाते. मग प्रत्यक्षात तक्रार द्यायला गेलेल्या व्यक्तीची तक्रार घेतली जात नाही, यातच काहीतरी काळेबेरे आहे का? असा संशयही त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांच्या कुटुंबातील कोणी तक्रार देऊ इच्छित असेल, तर सरकार अडथळे का आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.विमान कितीही विस्कळीत झाले तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो, मग त्यातील माहिती जाहीर का होत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. या प्रकरणाला राजकारणाचा रंग देऊ नये, असे सांगतानाच ही केवळ एक एफआयआर आहे. सरकार त्याला का घाबरत आहे? असा थेट प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. जर आमदाराचा एफआयआर घेतला जात नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? असेही ते म्हणाले. या प्रकरणावर सुनेत्रा पवार तसेच मुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करत त्यांनी राज्य व लोकसभा अधिवेशनात हा मुद्दा मांडावा, असे आवाहन संबंधित पक्षांच्या लोकप्रतिनिधींना केले.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *