Category: मुखय पान
तरुण राहण्यासाठी मानसिकता तरुण ठेवा:छंद जोपासणेही तितकेच महत्त्वाचे- बलराज संघई
काळ थांबत नाही. काळाचा नियम आहे. जीव-अजीव वस्तूंच्या परिवर्तनासाठी काळ हा कारणीभूत असतो. काळ थांबणार नाही, त्याला रोकता येणार नाही. काळाच्या गतीनेच दिवसेंदिवस वय वाढत जातं आणि आयुष्याचा अखेरचा टप्पा वार्धक्य म्हटलं जातं एक दिवस तो आपल्यासमोर येऊन ठेपतो. तर हे वार्धक्य,याला म्हातारपण समजलं तर माणूस मनानेही वयस्कर होऊन जातो. एक शारीरिक वय असतं आणि एक मानसिक वय असतं. शारीरिक वय वाढत जाणारच परंतु मानसिक वय वाढू नये. वयानुसार योग्य ती परिणाम बुद्धी आणि मानसिक समज यायलाच हवी. वयानुसार समजदारी यावी ही अपेक्षा असतेच. वय वाढत जातं त्याप्रमाणे दिवसेंदिवस अवयव क्षीण होत जातात. म्हणजेच शारीरिक क्षमता कमी होत जाते. परंतु सुरुवाती पासूनच व्यायाम आणि खाण्या पिण्यावर नियंत्रण असेल तर हा त्रास कमी जाणवतो. या सोबतच मनाची प्रफुल्लता ही असायला हवी. आपलं वय असणं आणि आपण दिसणं हे आपल्यावर अवलंबून आहे. एखादा पन्नास पंचावन्न वर्षांचा व्यक्ती जेव्हा तरुण मुलांना शारीरिक चपळतेने, दिसण्याने अस्तित्वाने लाजवतो तेव्हा हे लक्षात येतं. वाढत्या वयानुसार आपण आपल्या दिसण्याकडेही थोडंसं लक्ष द्यावं. त्यासाठी आवश्यक त्या आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करावा. शरीर चेहरा, त्वचा याकडे जरासं लक्ष दिलं तर जगण्यात ताजेपणा राहतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट मानसिकता ही आहे. आपण आयुष्यभरात कोणाशी कसे वागलो, कसे संबंध ठेवले यावर अवलंबून आहे की पुढे आपल्याशी कुटुंबातील समाजातील आणि सर्वच लोक कसे संबंध ठेवणार. आपण प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीला सकारात्मकपणे प्रतिसाद दिला तर सर्वांसोबत आपले दिवस हसून खेळून मजेत जातात. आणि मग वाढतं वय लक्षातही येत नाही. काळजी, जिम्मेदारी या गोष्टी सर्वांनाच असतात. आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये प्लॅनिंग ही खूप महत्त्वाचं असतं. दररोजच्या जीवनात आपण सर्वांना कुटुंबामध्ये समजून आणि सांभाळून घेतले असेल तर वाढत्या वयात आपल्याला तेही सांभाळून घेतीलच यात शंका नाही. यासह सहनशीलता आणि संयम ही असला पाहिजे. तसेच आपण आपले छंदही जोपासले पाहिजेत. प्रत्येकामध्ये कोणती न कोणती कला असते. आपली आवड आपण जाणून जोपासली पाहिजे. दररोजचे फिरणे, व्यायाम, आपल्या आवडीच्या गोष्टी अवश्य कराव्यात, जवळपास असलेल्या एखाद्या उद्यानामध्ये फेरफटका मारावा. निसर्ग, पाने-फुले, झाडं यांच्याकडे सौंदर्यपूर्ण दृष्टीने पहावे, निसर्ग आणि ईश्वर द्वारा निर्मित कोणताही जीव-अजीव सुंदरच आहे, कदापि असुंदर, कुरूप नाही अशी मानसिक धारणा असावी. वाचन करावे, वर्तमानपत्र असो, आवडीची पुस्तक असोत, आपला वेळ घालवण्यासाठी वाचन आवश्यकच आणि त्याने ज्ञानही वाढत जाते. आपला मित्र परिवार सांभाळावा मित्र असावेत. मित्रांशी दररोज बोललं पाहिजे. आपल्या मध्ये काही कलागुण असतील तर तेही जोपासले पाहिजेत. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपले कलागुण, आपल्या आवडी-निवडी आपली समजदारी आणि आपला स्वभाव हेच आपल्याला तारते. म्हणूनच एखादा वयस्कर ही तरुण असू शकतो आणि एखादा तरुणही वयस्कर वाटू लागतो. भलेही माणूस वयस्कर असो तो सर्वांना हवाहवासा वाटला पाहिजे. आपला कंटाळा येऊ नये असेच आपण सर्वांशी वागले पाहिजे. तरच आपलं वार्धक्यही आपल्याला जाणवत नाही आणि हाच काळ आणि वार्धक्य अवस्थेवर विजय प्राप्त झाला असे म्हणता येईल. शरीर भलेही क्षीण होवो , वय भले ही वाढत जावो, मानसिकता तरुण असावी. (बलराज संघई, 9420015108 | वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर)
Continue Reading
