Shocking Betrayal: Minister’s OSD Faces Attempted Murder Charges for Brutal Attack on Wife in Pune

सत्तेच्या उबेखाली मंत्र्यांचा ओएसडी माजला; पत्नी-मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणाऱ्या नराधमावर वडेट्टीवारांचा प्रहार

Shocking Betrayal: Minister’s OSD Faces Attempted Murder Charges for Brutal Attack on Wife in Puneपुणे: पुण्यातील हायप्रोफाईल क्वीन्स गार्डन परिसरात राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे यांनी आपल्याच पत्नी आणि मुलाला बॅटने अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे गंभीर पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
"मी मंत्र्यांचा ओएसडी, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही" मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलमधील संशयास्पद चॅटबद्दल विचारणा केल्यामुळे कारंडे यांनी आपल्या पत्नीवर आणि मध्यस्थी करणाऱ्या मुलावर क्रिकेटच्या बॅटने खुनी हल्ला केला. "मी मंत्र्यांचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही," अशा दर्पोक्ती करत कारंडे यांनी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. मारहाणीचे फोटो समोर आले असून, त्यात पीडित पत्नी आणि मुलाच्या अंगावर निळेशार वण दिसून येत आहेत, जे या हल्ल्याची भीषणता दर्शवतात.

मंत्र्यांच्या पंखाखाली गुंडांना अभय?
या घटनेवर संताप व्यक्त करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "सत्तेच्या उबेखाली हे लोक इतके माजले आहेत की, स्वतःच्या पोटच्या मुलाला बॅटने फोडून काढताना त्यांचे हात थरथरले नाहीत. आपल्या पत्नीला आणि निष्पाप मुलाला रक्ताळलेल्या अवस्थेत घराबाहेर काढणारा हा नराधम अद्याप मोकाट कसा? मंत्र्यांच्या पंखाखाली बसून अशा गुंडांना अभय दिले जात आहे का?" असा थेट सवाल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अतुल सावे यांना विचारला आहे.

शक्ती कायदा मोदी सरकारने गुंडाळून ठेवला
पुण्यात आजोबाने नातीवर बलात्कार केल्याच्या आणि कारंडे यांच्या घरगुती हिंसेच्या घटनांचा संदर्भ देत वडेट्टीवार यांनी 'शक्ती कायद्या'ची मागणी पुन्हा लावून धरली आहे. "महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलेला शक्ती कायदा मोदी सरकारने बासनात गुंडाळून ठेवला आहे. राज्यातील लेकींच्या सुरक्षेसाठी हा कायदा आणण्याची हिंमत सध्याच्या राज्य सरकारमध्ये नाही," अशी टीका त्यांनी केली. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हकालपट्टीची मागणी
कारंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली केली असतानाही मंत्री सावे यांनी अद्याप त्यांना पदावरून का हटवले नाही? असा प्रश्न उपस्थित करत वडेट्टीवार यांनी कारंडे यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. या घटनेमुळे उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या अधिकारांच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *