Pune Heatwave: Record-Breaking Temperatures Grip the City

पुण्यात यंदा विक्रमी तापमान! उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर.

Pune Heatwave: Record-Breaking Temperatures Grip the Cityपुण्यात तापमानाचा पारा वाढला आहे. यंदा विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच यंदाची उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

पुणे : पुणे शहरात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल सुरू आहेत. विशेषतः लोहगाव परिसरात तापमान तब्बल 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून मागील तीन दिवसांपासून सातत्याने उष्णतेची तीव्रता कायम आहे.
लोहगाव येथे यंदाच्या एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः ओस पडत असून कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडताना दोनदा विचार करत आहेत. सकाळी 10 नंतरच सूर्याचा चटका वाढू लागतो आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर होते.

हवामान विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की, या कालावधीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. जर अत्यावश्यक कारण असेल तर छत्री, टोपी, गॉगल्स आणि पुरेसे पाणी सोबत ठेवावे. उष्माघाताचा धोका वाढल्याने लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, गेल्या 30 वर्षांच्या नोंदींमध्ये एप्रिल महिन्यात पुण्याचे तापमान 42 अंशांपेक्षा जास्त फक्त पाच वेळा गेले आहे. त्यामुळे यंदाची उष्णतेची लाट ही तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर मानली जात आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.

हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, 18 एप्रिलपर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत पुण्यातील तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, 18 ते 19 एप्रिलनंतर राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.

सध्या पुणेकरांनी जास्तीत जास्त पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि दुपारच्या वेळेत घरातच राहणे हेच सुरक्षित ठरेल. उष्णतेची ही लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

दरम्यान, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. या काळात नागरिकांना आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तसेच चार दिवसांनी म्हणजे 19 एप्रिलपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 19 एप्रिलला तापमानात घट होण्याची शक्यता आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *