Mumbai : राज्यावर पुन्हा अवकाळी संकट, ४ एप्रिलपर्यंत वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai : राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होत असतानाच आज, ३० मार्चपासून पुन्हा एकदा आभाळी वातावरण आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाच्या नव्या सत्राला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात बदल जाणवू शकतो, अशी माहिती कृषी विभागाने रविवारी दिली.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, ३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहू शकते. मात्र, हवामान अस्थिर राहून ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १ ते ४ एप्रिलदरम्यान पुन्हा वादळी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत आभाळी वातावरण, दुपारनंतर वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते.

दरम्यान, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

यासोबतच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा परिस्थितीत झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली तसेच विद्युत ट्रान्स्फॉर्मर, विजेचे खांब किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *