Mumbai : मुंबईत जलमार्गाचे जाळे वाढणार; 11 नव्या मार्गांवर 24 टर्मिनल आणि नवीन जेट्टीसह बंदराचा विकास

Mumbai : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूककोंडीला पर्यायी, पर्यावरणपूरक व स्वस्त पर्याय म्हणून सध्याचे जलमार्गाचे 125 किलोमीटरचे जाळे 340 किलोमीटरपर्यंत विस्तारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली.

कसा होणार विकास?
त्यामुळे सध्या वार्षिक एक कोटी 60 लाख असलेली प्रवासी संख्या वर्ष 2031पर्यंत सात कोटी 39 लाखापर्यंत वाढेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यासाठी 21 विद्यमान जलमार्गावरील 20 टर्मिनलचे अद्ययावतीकरण तसेच 11 नवीन जलमार्गांवर 24 टर्मिनलच्या निर्मितीसाठी सहा हजार 600 कोटी रुपये खर्च सरकारला अपेक्षित आहे.

मुंबई तसेच शहराच्या आसपासच्या ठिकाणांना जोडण्यासाठी जलवाहतूक अधिक सक्षम करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. मुंबई मधील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास येत असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पासाठी राज्य हिस्सा म्हणून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाढवण बंदर प्रकल्पातून 12 लाखांहून अधिक थेट रोजगार निर्मिती होणार आहे. वाढवणच्या आसपास सुमारे 44 गावांमधील स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचेही अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले.

मेट्रो वाढणार, रस्ते विस्तारणार
राज्यातील प्रवासी व मालवाहतुकीसाठी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी येत्या काळात राज्यभरात १ हजार २०० किलोमीटर लांबीचे मेट्रोमार्ग आणि ६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकासित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पादरम्यान केली. आगामी वर्षात ५० किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे. सन २०२९ पर्यंत आणखी १६५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमत्र्यांनी यावेळी अर्थसंकल्पात केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *