अजित पवारांच्या सभागृहात छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे नवा वाद; पुण्यातील संघटना आक्रमक, थेट राजीनाम्याची केली मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणाने सभागृह चांगलेच गाजवले. शिंदे गटाने ठाकरे गटावर केलेल्या आरोपांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही जे बाहेर केलं ते आता विसरून जा, मुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णपणे राजकीय होतं, अशी टीका अजित पवारांनी केली. 

दरम्यान, अजित पवारांनी सभागृहात छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात केलेल्या एका विधानावरून आता चांगलाच राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा पाठही शिकवला. तसेच, छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते, असं विधान अजित पवार यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, पुण्यात पतीत पावन संघटनेकडून अजित पवारांचा निषेध करण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान आहे, अस्मिता आहे. अजित पवार म्हणतात की, छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केली आहे.

'आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही.'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा.छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते,धर्मवीर नव्हते.त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही', असं विधान अजित पवारांनी केलं होतं.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *