Raigad : रस्त्याचं काम सुरू असताना दुर्गंधी येऊ लागली; तपास केला असता धक्कादायक प्रकार उघड, महिलेचं अर्धवट जळालेलं शव आढळलं

Raigad : रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या आंबेनळी घाट परिसरात एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली आणि चिरेखिंडच्या वर मुख्य रस्त्यालगत असलेल्या मोरीत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील शव आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अत्यंत संशयास्पद परिस्थितीत सापडलेल्या या शवमुळे हत्या झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुर्गंधी आल्यानं घटना उघडकीस
आज गुरुवारी सकाळच्या सुमारास घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना काही कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी येऊ लागली. सुरुवातीला एखाद्या प्राण्याचा शव असावा, असा त्यांचा समज झाला. मात्र, दुर्गंधी वाढत गेल्याने त्यांनी रस्त्यालगतच्या मोरीत डोकावून पाहिले असता त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील शव दिसून आला. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

महिलेची ओळख अस्पष्ट
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून पंचनामा केला व शव ताब्यात घेतला. तपासासाठी फॉरेन्सिक पथक व व्हॅनही घटनास्थळी बोलावण्यात आली. प्राथमिक पाहणीत शव जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले असून, हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोरीत टाकण्यात आल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे 28 ते 30 वर्षांदरम्यान असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. शरीरावरील जखमा, जळाल्याचे प्रमाण आणि घटनास्थळी आढळलेले पुरावे यांच्या आधारे पोलीस विविध शक्यतांचा तपास करत आहेत. शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

घटनेनं परिसरात खळबळ
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींचाही आढावा घेतला जात आहे. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, स्थानिकांकडून मिळणारी माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. घाट परिसरातून संशयास्पद हालचाली झाल्या का, याचाही शोध घेतला जात आहे. आंबेनळी घाट हा महाबळेश्वरकडे जाणारा महत्त्वाचा पर्यटन मार्ग असल्याने या घटनेमुळे पर्यटकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याची तसेच घाट परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलादपूर पोलीस ठाण्याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच या प्रकरणातील सत्य समोर येईल आणि आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या भीषण घटनेमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *