जयश्री जाधव यांचा कॉलम:फक्त ‘इव्हेंट’ साजरा न करता लिंगभेद नसलेली व्यवस्था हवी

8 मार्च 1908 साली अमेरिकेतील वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी ऐतिहासिक निदर्शने केली होती. कामाचे तास कमी करणे, कामाच्या जागी सुरक्षितता आणि सर्व स्त्री व पुरुष यांना मतदानाचा हक्क या मागण्यांसाठी त्या आग्रही राहिल्या. त्यांनी दिलेली ‘ब्रेड अँड रोसेस’ ही घोषणा गाजली. पोटासाठी भाकरी आणि आयुष्यासाठी सन्मान अशा व्यापक अर्थाची ती घोषणा होती. क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती या अमेरिकन कामगार स्त्री संघर्षामुळे प्रभावित झाली. 1910 साली कोपेनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत 8 मार्च हा दिवस अमेरिकन महिला कामगारांच्या संघर्षाच्या स्मरणार्थ ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव तिने मांडला व तो पारित झाला. भारतात मुंबई येथे 8 मार्च 1943 रोजी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी जागतिक महिला दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, पण स्त्रियांना कायमच सन्मानाने आणि सुरक्षित जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रोजच महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. जातीवादातून संघर्ष झाला तरी महिलांना वेठीस धरले जाते व त्यांच्यावर अत्याचार केले जातात, याचे उदाहरण म्हणजे मणिपूर येथील घटना. दोन समाजांतील संघर्षामध्ये अनेक महिलांवर अत्याचार झाले आहेत. कोलकाता येथील एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या केली, अशा अनेक घटना आपण ऐकतो आणि हळहळ व्यक्त करतो आणि काळ जातो तसा त्या घटनेची तीव्रता संपते. ही विकृती कधी संपणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो, कारण महिला घराबाहेरच नाही तर त्यांच्या घरात सुद्धा सुरक्षित नाहीत. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. संगमनेरस्थित लोकपंचायत संस्थेच्या माध्यमातून अकोले व संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये महिलांसोबत करत असलेल्या कामातून कौटुंबिक हिंसाचाराची, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध, संशय, मूल होत नाही किंवा मुलगा होत नाही, पैशाची मागणी ही कारणे समोर आली आहेत. हा हिंसाचार पोसण्यामागे माहेरची माणसे हातभार लावत असतात. कौटुंबिक छळ होत आहे हे माहिती असूनही तिला आधार न देता, सासरीच नांदण्यासाठीचा आग्रह ही माणसे करतात. ग्रामीण भागात हिंसाचारग्रस्त महिलांसाठी काम करत असताना समाजातील या वास्तवाची जाणीव होते. स्त्री घरातून परवानगी नसेल तर घराच्या बाहेर पडू शकत नाही. ज्या गावांमध्ये आम्ही काम करतो तिथे त्या महिलांसोबत बैठक घ्यायची असेल तर जनावरांचा चारा, शेतातील काम, स्वयंपाक, धुणे-भांडी अशी सर्व कामे केल्याशिवाय त्या बाहेर पडत नाहीत. काही महिला तर मजुरीसाठी बाहेरगावी जातात; 3 वाजता उठून स्वयंपाक करून 5 वाजता निघतात, तर संध्याकाळी 8 वाजता घरी येतात. काही अनुभव असेही आहेत की, उच्च शिक्षण घेतलेल्या मुलीही नवऱ्याने कितीही मारले, तिथे प्रेम नाही, तरी सासरीच नांदायचे आहे असा अट्टाहास करताना दिसतात; कारण माहेरी राहिली तर तिची समाजात अवहेलना होते. गावात भाऊबंदकीत किंवा शेजारी काही वाद झाला तर त्या घरातील स्त्रीने त्यामध्ये भाग घेऊ नये, तिला बोलू दिले जात नाही. या सर्व मानसिकता घडवण्याचा व तिलाच त्याचा वाहक बनवणाऱ्या या पुरुषप्रधान समाजाने महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता, महिला दिनासारखे ‘इव्हेंट’ असे भास निर्माण केले आहेत. हे भास जेव्हा मिटतील तेव्हा प्रत्येक दिवस महिला सन्मानाने आणि निर्भीडपणे जगतील, लिंगभेद न करणारी न्यायव्यवस्था प्रस्थापित होईल, तेव्हा 8 मार्च हा एक दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची गरज पडणार नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.) आजही स्त्री कौटुंबिक हिंसाचारामुळे पोळलेलीसासर व माहेरच्या हिंसाचक्रात महिला अडकलेल्या आहेत. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांच्यासोबत कोणीही उभे रहात नाही. अशा स्थितीत त्या तणावामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *