Telangana Heavy Rainfall: तेलंगणामध्ये पावसाचा कहर, वेगवेगळ्या घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू

Telangana News : तेलंगणामध्ये २२ जुलैपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आले. मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे तेलंगणामध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे तेलंगणामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून शाळा आणि महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये गुरुवारी झालेला पाऊस हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस असल्याची नोंद झाली आहे.

तेलंगणामध्ये गेल्या ६ दिवसांपासून पावसाची बॅटिंग सुरु आहे. मुसळधार पावसामुळे तेलंगणामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे सखळ भागामध्ये पाणी साचले असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे. पूरामुळे रस्ते आणि शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये ८ जणांनी आपला जीव गमावला आहे.

या संततधार पावसामुळे तेलंगणा सरकारने राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना २८ जुलैपर्यंत सुट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणाच्या शिक्षण मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांनी याआधी राज्यातील अतिवृष्टीमुळे सर्व शैक्षणिक संस्थांना २६ आणि २७ जुलै रोजी दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती.

तेलंगणातील हनुमाकोंडा, मुलुगु, जयशंकर भूपालपल्ली, जनगाव, भद्राद्री कोठागुडेम, करीमनगर आणि वारंगल जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे तेलंगणा सरकारने संपूर्ण राज्य प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवले आहे.

मुख्य सचिव शांती कुमारी यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सूचनेनुसार, राज्यातील पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत.' तेलंगणामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात पूरसदृश परिस्थिती कायम आहे. या भागातील 1900 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

तेलंगणामध्ये एका दिवसांत आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ६४९.८ मिमी पाऊस झाला आहे. तेलंगणा स्टेट डेव्हलपमेंट प्लॅनिंग सोसायटीच्या नोंदीनुसार, राज्याच्या इतिहासातील हा सर्वाधिक पाऊस आहे. तेलंगणातील पूर परिस्थितीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *