Pune : शेवटचा श्वास पुण्यात घ्यावा; ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरांची इच्छा

पुणे - कधी शेवटचा दिवस येईल मला सांगता येणार नाही. पण, कधी शेवटचा श्वास घ्यावा लागला, तर तो पुण्यात असावा, अशी भावनिक इच्छा ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे व्यक्त केली.

‘दुर्दम्य आशावादी - डॉ. रघुनाथ माशेलकर’ या त्यांच्यावरीलच चरित्रग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. ‘पुण्यावर माझे फार प्रेम असून, या शहराने मला घडविले आहे. मला पुण्याने प्रचंड प्रेम दिले असून, पुण्यातच शेवटचा श्वास घ्यावा’, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला डॉ. माशेलकर यांचे पीएच. डी. चे मार्गदर्शक प्रा. एम.एम. शर्मा, ज्येष्ठ अणुशास्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. माशेलकरांच्या पत्नी वैशाली माशेलकर, पुस्तकाचे लेखक डॉ. सागर देशपांडे आणि सह्याद्री प्रकाशनच्या संचालिका स्मिता देशपांडे आदी उपस्थित होते. माशेलकरांनी यावेळी तीन इच्छा व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘मला पुनर्जन्म मिळाला, तर तीच आई, तीच पत्नी, तेच मुले आणि तेच मित्र मिळावे, खडतर असला तरी हा प्रवास पुन्हा करायचा आहे. तसेच, माझं उर्वरित आयुष्य देवाने घेतले तरी चालेल. पण २०४७ ला शंभरीतला भारत कसा आहे, हे पाहण्यासाठी एक दिवस मला द्यावा.’

डॉ. माशेलकरांच्या ५८ वर्षांच्या वाटचालीचे साक्षीदार असलेले त्यांचे गुरू डॉ. शर्मा म्हणाले, ‘माझा सहकारी आभाळाइतका मोठा झाल्याचा आनंद आहे. डॉ. माशेलकर यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व दुर्मिळ आहे. तळागाळात होत असलेल्या नवसंशोधनाची भारतात फारसे कौतुक होत नाही. पण भारतातील नवसंशोधनाचे योग्य पद्धतीने कौतुक झाल्यास मोठा बदल घडेल. ते काम डॉ. माशेलकर यांनी केले आहे.’ नव्या पिढीतील तरुण, उद्योगांसाठी डॉ. माशेलकर मार्गदर्शक असून, देशात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. देशाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यावर डॉ. माशेलकर यांनी घेतलेली भूमिका पटली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *